संभाजी ब्रिगेड आता उतरणार राजकारणात!
By Admin | Updated: August 31, 2015 01:34 IST2015-08-31T01:34:10+5:302015-08-31T01:34:10+5:30
प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांच्याशी बातचीत.
_ns.jpg)
संभाजी ब्रिगेड आता उतरणार राजकारणात!
अकोला : परिवर्तनवादी चळवळीच्या तालमीत तयार झालेले कार्यकर्ते वेगवेगळ्य़ा पक्षात जात असतील, तर हे चळवळीचे अपयश आहे. पुरोगामी चळवळीत परिपक्व झालेल्या कार्यकर्त्यांंनी राजकीय चळवळ गतिमान करण्यासाठी संभाजी ब्रिगेडने पावले उचलली असून, छत्रपती शिवाजी महाराजांचे शंभर टक्के समाजकारण व राजकारण या शिवसूत्राची अंमलबजावणी करण्याचे ठरवले आहे. यासाठी राजकारणात उतरत असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी अकोला येथे 'लोकमत'शी बोलताना दिली.
मराठा सेवा संघाच्या एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आखरे रविवारी अकोल्यात आले होते, तेव्हा त्यांनी संभाजी ब्रिगेडने राजकारणासह पाच सूत्री कार्यक्रम हाती घेतल्याचे सांगितले.
प्रश्न-समाजकारण व राजकारण कसे करणार?
उत्तर- मराठा, बहुजन समाजाचे वैचारिक प्रबोधन करण्याची खरी गरज आहे. संभाजी ब्रिगेड ते करीत आहेच, पण राजकीय सत्तेच्या माध्यमातून यात आमूलाग्र बदल घडवून आणता येतो. हे तितकेच सत्य आहे . पुरागोमी चळवळीतील कार्यकर्त्यांंना इतर राजकीय पक्षात त्या पक्षाच्या अजेंड्यानुसार काम करावे लागते. येथे मात्र त्यांचा शंभर टक्के पुरोगामी चळवळीला गतिमान करण्यास मोठा हात भार लागणार आहे.
प्रश्न-राजकीय चळवळीची सुरुवात केली का?
उत्तर- ग्रामपंचायत निवडणुकीत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांंनी चांगली कामगिरी केली. बुलडाणा जिल्हय़ात चांगले चित्र आहे. राजकीय चळवळीला अधिक व्यापक करण्यासाठी योजना आखली जात आहे. सध्या शेतकर्यांचे प्रश्न हाती घेतले आहेत. मराठवाड्यात शेतकरी मेळावे, मोर्चे काढले जात आहेत. या मोर्चाला शेतकर्यांचा उत्स्फू र्त प्रतिसाद लाभत आहे.
प्रश्न- पाचसूत्री कार्यक्रम कोणता ?
उत्तर- मराठा-बहुजन समाजाला प्रगतीची कवाडे उघडायची असतील तर शिक्षण क्षेत्रात प्रगती करण्याची गरज असून, या क्षेत्रात आपले विचाराचे लोक येणे गरजेचे आहे. म्हणजेच शिक्षण, अर्थकारण, धर्मकारण, राजकारण आणि प्रचार, प्रसार माध्यम सत्ता बहुजन समाजाच्या हाती येणे गरजेचे आहे. हेच आमचे ध्येय असून, त्यादृष्टीने काम करण्यास सुरुवात केली आहे.
प्रश्न- बहुजन समाजाला एकत्र कसे करणार?
उत्तर- राज्यात आम्ही परिवर्तनवादी चळवळीच्या माध्यमातून समोर आल्याने इतर सर्वच पुरोगामी चळवळीला बळ मिळालं आहे. आता मराठा समाज ताकदीने पुढे येत असूून, या चळवळीत स्वत:ला झोकून देत आहे. खरे तर मराठय़ांचा या अगोदर गैरवापर झाला. त्यांच्यात सरंजामशाहीचा अविर्भाव ठासून भरवला होता, पण आम्ही तो अविर्भाव वैचारिक प्रबोधनातून काढला, काढत आहोत. बहुजन समाजाला जोडताना, आम्ही मराठा समाजातील पोट जातींचा बिमोड करण्यासाठी पाऊल टाकले आहे. आंतरजातीय विवाह, विधवा विवाह घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याला यशही येत आहे.
प्रश्न- वैचारिक प्रबोधन नेमके कोणतं करता?
उत्तर- या देशाला प्रगतीकडे नेणार्या पुरोगामी महामानवांचे विचार समाजापर्यंंत नेण्याचे काम करीत असून, सर्व समाज एकत्र कसा नांदेल आणि प्रत्येकाला समान न्याय कसा मिळेल, हा आमचा उद्देश आहे. कर्मकांड, अंधश्रद्धेतून हा समाज बाहेर काढण्यासाठी त्यांच्या समोर पर्याय ठेवत आहोत. प्रवास खडतर आहे, पण तो करावाच लागणार आहे.