नियम धाब्यावर; समायोजनासाठी शिक्षकांवर दबाव
By Admin | Updated: May 7, 2015 02:21 IST2015-05-07T02:21:44+5:302015-05-07T02:21:44+5:30
अकोला मनपात बैठक; शिक्षकांचा विरोध

नियम धाब्यावर; समायोजनासाठी शिक्षकांवर दबाव
अकोला : स्वत:चे उखळ पांढरे करून घेण्यासाठी गोरगरीब चिमुकल्या विद्यार्थ्यांचे भविष्य दावणीला लावण्याचे प्रयत्न मनपा प्रशासनाकडून मोठय़ा जोरात सुरू आहेत. शाळा समायोजन करण्याचे शासनाचे अथवा शिक्षण संचालकांचे कोणतेही आदेश नसताना आयुक्त सोमनाथ शेटे यांनी नियम धाब्यावर बसवून समायोजनाची प्रक्रिया पूर्ण केली. मनपात बुधवारी पार पडलेल्या बैठकीत प्रशासनाच्या मनमानीला मुख्याध्यापक-शिक्षकांनी विरोध केल्याची माहिती समोर आली आहे. मनपात २00६-0७ मध्ये भाजप-शिवसेनेची सत्ता असताना मनपाच्या ७४ शाळेपैकी १९ शाळांचे समायोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होत असल्याची सबब पुढे करणार्या शिक्षणाधिकारी शाहीन सुलताना यांनी शिक्षण प्रणालीत सुधारणा करण्यासाठी आजवर कोणतेही ठोस प्रयत्न केल्याचे ऐकीवात नाही. केजी-१, केजी-२ तसेच सेमी इंग्लिशचा प्रस्ताव लागू केल्यास विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत मोठी वाढ होण्याचे आशादायक चिन्ह आहेत. त्यानुषंगाने प्रशासनाने प्रयत्न करणे अपेक्षित असताना पुन्हा एकदा मनपाच्या ५५ शाळेपैकी २२ शाळांचे समायोजन करण्याचा एकतर्फी निर्णय आयुक्त सोमनाथ शेटे यांनी घेतला. आयुक्तांच्या निर्णयाला विरोध न करता चुप्पी साधल्यामुळे भाजप-शिवसेनेचे पदाधिकारी व नगरसेवकांची भूमिका संशयास्पद ठरत आहे. आरटीई अँक्टला धाब्यावर बसवत २२ शाळांचे समायोजन करण्यात आले असून यासंदर्भात राज्य शासनाचे अथवा शिक्षण संचालकांचे कोणतेही आदेश नाहीत, हे येथे उल्लेखनीय. अनेक शाळांमधील पटसंख्या २0 पेक्षा जास्त असतानादेखील संबंधित शाळा समायोजित करण्यात आल्या. या विषयाला उर्दू शिक्षक संघटना, शिक्षक भारती, शिक्षक सेनेसह काही शिक्षक संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला असून, शासनाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत.