दरवळतोय उटण्यांचा सुगंध..
By Admin | Updated: October 23, 2014 02:08 IST2014-10-23T01:53:15+5:302014-10-23T02:08:33+5:30
वनौषधींच्या मिश्रणामुळे आरोग्यास उपयुक्त.

दरवळतोय उटण्यांचा सुगंध..
अकोला : मांगल्याचे प्रतीक असणार्या दीपोत्सवाची चाहूल लागताच बाजारपेठेत विशेष महत्त्व असणार्या सुगंधी उटण्यांची मागणी वाढली आहे. दीपावलीतील अभ्यंग स्नानात उटण्याला विशेष महत्त्व असून, उटणे हे वनौषधींपासून बनविलेले असावे, असा संकेत आहे. दिवाळीचा सण म्हणजे थंडीला सुरुवात होते. मात्र, यंदा थंडी गायब झाली असून, बर्यापैकी उकाडा जाणवत असतानाही नागरिकांकडून उटण्याला चांगलीच मागणी होत आहे. हिवाळय़ात त्वचेची काळजी घेण्यासाठी उटणे उपयुक्त ठरते. उटणे चंदन, गुलाब, मोगरा, कापूर कचरी, नागरमोथा, वाळा, आंबेहळद, बावची, कचुरा वडा, दवणा, मारवा यापासून तयार केले जाते. पहाटे उठून सूर्योदयापूर्वी अभ्यंग स्नान केले जाते. अभ्यंग म्हणजे पायापासून डोक्याच्या दिशेने तेल लावणे होय. हे स्नान दिवाळी ते संक्रांत असे चार महिने करावे, असे आयुर्वेद सांगते. अभ्यंग स्नान हे तिळाच्या तेलापासून केले जाते. तिळाचे तेल ज्या वनौषधीबरोबर प्रक्रिया करावे तिचे गुण आत्मसात करते. तिळाचे तेल हे उष्ण, तीक्ष्ण व सूक्ष्म गुणाचे असते, ते शरीराचा ताण कमी करते. साबणातील फेसामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल व आद्र्रताही निघून जाते तर उटण्यामुळे ती राखली जाते. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिल्यास दिवाळी पर्वात ब्रह्मंडात तेज, आप आणि वायुयुक्त चैतन्य प्रवाहांचे भूतलावर येण्याचे प्रमाण जास्त असल्याने वायुमंडलात देवत्वाचे प्रमाणही जास्त असते. या देवत्वरूपी चैतन्यकणांचे त्या त्या घटकांतून ग्रहण होऊन त्याचा त्याला चैतन्य फलप्राप्तीच्या दृष्टीने अधिक लाभ व्हावा, यासाठी या काळात तेज, आप आणि वायुवर्धक उटणे अंगाला लावून देहाची चैतन्य ग्रहण करण्यातील संवेदनशीलता वाढवली जाते.