अन्न सुरक्षा योजनेने पळविला हक्काचा घास
By Admin | Updated: May 16, 2014 21:36 IST2014-05-16T18:49:58+5:302014-05-16T21:36:37+5:30
अन्न सुरक्षा योजनेने गरिबांना मिळणारा हक्काचा घास हिरावल्या गेल्यामुळे ग्रामीण भागात या योजनेबाबत नाराजी दिसत आहे.

अन्न सुरक्षा योजनेने पळविला हक्काचा घास
आगर(अकोला): मोठा गाजावाजा करून अंमलात आलेल्या अन्न सुरक्षा योजनेने गरिबांना मिळणारा हक्काचा घास हिरावल्या गेल्यामुळे ग्रामीण भागात या योजनेबाबत नाराजी दिसत आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत व दारिद्र्यात जीवन जगणार्या कुटुंबांना सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत रास्त भाव धान्य दुकानांमधून दरमहा धान्य मिळत होते. यामध्ये प्रतिकार्ड धान्य व रॉकेल वितरित करण्यात येत होते. यामध्ये बी.पी. एल., अंत्योदय कुटुंबांना प्रतिकार्डप्रमाणे धान्य मिळत होते; परंतु यावर्षी मोठा गाजावाजा करून अंमलात आलेल्या अन्न सुरक्षा योजनेंतर्गत धान्य वाटपाचे निकष बदलले आहेत. आता या योजनेत प्रतिव्यक्ती या प्रमाणे धान्य मिळत असल्याने ज्यांचे कुटुंब मर्यादित आहे, अशा कुटुंबांच्या तोंडचा हक्काचा घास पळविला जात असल्याचे बोलले जात आहे. या योजनेचा खरा लाभ मोठ्या कुटुंबांनाच होत असल्याने सदर योजना कुटुंब वाढीस पर्यायाने लोकसंख्या वाढीस प्रोत्साहन देणारी असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. सदर योजनेच्या निकषांत सुधारणा करून मर्यादित सदस्य असलेल्या कुटुंबावर अन्याय होणार नाही, याची काळजी घेण्यात यावी, अशी मागणी होत आहे.