संयम संपला; ग्रामीण भागात पेरणीची लगबग
By Admin | Updated: July 13, 2014 00:53 IST2014-07-13T00:53:08+5:302014-07-13T00:53:08+5:30
कपाशी व सोयाबीनचीही वेळ निघून जाणार असल्यामुळे शेतकर्यांनी अल्प पावसातच पेरणीला सुरुवात केली आहे.

संयम संपला; ग्रामीण भागात पेरणीची लगबग
अकोला: जुलै महिन्याचा दुसरा आठवडा संपला तरी जिल्हय़ात पेरणीयोग्य पाऊस पडला नाही; मात्र त्यानंतरही पेरणीला उशीर झाल्यामुळे पावसाच्या अपेक्षेने शेतकर्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे. पेरणीची वेळ निघून गेली असून, मूग व उडीद या पिकांची पेरणी केल्यावरही उत्पादन येणार नाही. आणखी काही दिवस पेरणी केली नाही तर कपाशी व सोयाबीनचीही वेळ निघून जाणार असल्यामुळे शेतकर्यांनी अल्प पावसातच पेरणीला सुरुवात केली आहे. गत काही वर्षांपासून जिल्हय़ात एकूण क्षेत्रावर सोयाबीनची ६0 टक्के पेरणी करण्यात येत होती. यावर्षी कपाशीचे क्षेत्र वाढले आहे. सोयाबीनची आतापर्यंत केवळ ३0७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. कापसाची १२६0४.४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. सरासरीच्या तुलनेत ही केवळ ७ टक्के असून, एकूण लक्ष्याच्या तुलनेत केवळ १0 टक्के पेरणी करण्यात आली आहे. ज्या शेतकर्यांकडे ओलिताची व्यवस्था आहे, त्यांनी जून महिन्यातच पेरणी केली होती. आकोट तालुक्यात कपाशीची १९३0 हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. तेल्हारा तालुक्यात ३४२८ हेक्टरवर, बाळापूरमध्ये २१५0, पातूर १२00, अकोला ३४३.४, बाश्रीटाकळी २७५९, मूर्तिजापूर ७९२ हेक्टरवर कपाशीची पेरणी करण्यात आली आहे, तर सोयाबीनची तेल्हारा तालुक्यात २३८ हेक्टरवर, बाश्रीटाकळी ३३ तर मूर्तिजापूर तालुक्यात ३६.२ हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. . १00 मिमी पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नये, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.