रस्त्यांची दुरुस्ती करा, अन्यथा सरकारविरुद्ध न्यायालयात याचिका!
By Admin | Updated: September 3, 2015 01:33 IST2015-09-03T01:33:56+5:302015-09-03T01:33:56+5:30
अकोला बार असोसिएशनने मूक मोर्चातून दिला इशारा.

रस्त्यांची दुरुस्ती करा, अन्यथा सरकारविरुद्ध न्यायालयात याचिका!
अकोला : शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेसंदर्भात अकोला बार असोसिएशनच्यावतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला असून, जिल्हाधिकार्यांना रस्ते दुरुस्तीची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास सरकारविरुद्ध याचिका दाखल करण्याचा इशारादेखील यावेळी देण्यात आला. शहरातील रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे अकोलेकरांना आरोग्यविषयक तसेच मानसिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्या अनुषंगाने अकोला बार असोसिएशनच्यावतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा स्टेशन रोडस्थित अकोला बार असोसिएशनच्या कार्यालयातून बसस्थानक, गांधी रोड, पंचायत समिती रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. शहरातील रस्त्यांची महिन्याभरात दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा सरकारविरुद्ध फौजदारी, दिवाणी तसेच जनहित याचिका दाखल करण्यात येणार असल्याचा इशारादेखील असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकार्यांना निवेदनाद्वारे देण्यात आला. मोर्चात अँड. अजय वाघमारे, अँड. पी.एम. तायडे, अँड. रविकांत ठाकरे, अँड. मुन्ना खान, अँड. गणेश पाठक यांची उपस्थिती होती.