शेतक-यांच्या कर्जाचे पुनर्गठण अडकले बँकांमध्ये
By Admin | Updated: May 9, 2015 01:59 IST2015-05-09T01:59:57+5:302015-05-09T01:59:57+5:30
अकोला जिल्ह्यातील कर्जदार शेतक-यांना पीककर्ज केव्हा मिळणार?

शेतक-यांच्या कर्जाचे पुनर्गठण अडकले बँकांमध्ये
संतोष येलकर/ अकोला : दुष्काळी परिस्थितीत कर्जदार शेतकर्यांच्या पीककर्जाचे पाच वर्षांसाठी पुनर्गठण आणि त्यांना पुन्हा पीककर्ज उपलब्ध करण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात असला तरी ८ मेपर्यंत जिल्ह्यातील १ लाख १0 हजारांवर कर्जदार शेतकर्यांच्या कर्जाचे पुनर्गठण करण्यात आले नाही. कर्जाचे पुनर्गठन करण्याची प्रक्रियाच बँकांमध्ये अडकल्याने, कर्जदार शेतकर्यांना या योजनेचा लाभ केव्हा मिळणार, याबाबत प्रश्न निर्माण होत आहेत.
यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने नापिकीमुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थि तीत शेतकरी हवालदिल झाला. दुष्काळाच्या दुष्टचक्रात शेतकरी अडकल्याच्या पृष्ठभूमीवर २0१४-१५ मध्ये पीककर्ज घेतलेल्या कर्जदार शेतकर्यांच्या पीककर्जाचे पाच वर्षांसाठी पुनर्गठण करून शेतकर्यांना यावर्षी नवीन कर्ज उपलब्ध करण्याचा निर्णय ७ एप्रिल रोजी राज्य शासनामार्फत घेण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातील कर्जदार शेतकर्यांच्या कर्जाचे पाच वर्षांसाठी पुनर्गठण करून, त्यांना यावर्षी पुन्हा कर्ज उपलब्ध करण्याचे निर्देश जिल्हा अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांमार्फत १३ व २६ एप्रिल रोजी जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह जिल्ह्यातील २७ राष्ट्रीयीकृत बँकांना देण्यात आले. सन २0१४-१५ मध्ये जिल्ह्यात १ लाख १७ हजार ५५९ शेतकर्यांनी पीककर्ज घेतले आहे. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज घेतलेल्या ७0 हजार शेतकर्यांसह राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्ज घेतलेल्या ४८ हजार कर्जदार शेतकर्यांचा समावेश आहे. कर्जदार शेतकर्यांच्या कर्जाचे पाच वर्षांसाठी पुनर्गठण करण्याची प्रक्रिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून अद्याप सुरू करण्यात आली नसल्याने, ७0 शेतकर्यांच्या कर्जाचे पुनर्गठण होणे अद्याप बाकी आहे.