स्त्रियांच्या सामाजिक प्रश्नांवरील उपाय ग्रामगीतेत
By Admin | Updated: December 28, 2014 01:00 IST2014-12-28T01:00:37+5:302014-12-28T01:00:37+5:30
अकोला येथील राष्ट्रसंत पुण्यतिथी महोत्सवाच्या महिला संमेलनात उमटला सूर.

स्त्रियांच्या सामाजिक प्रश्नांवरील उपाय ग्रामगीतेत
अकोला : या विज्ञानयुगात एकीकडे प्रगती होत असताना स्त्रियांच्या सामाजिक प्रश्नांत वाढ होत आहे. स्त्रियांसंदर्भात जेवढी सुखांची निर्मिती होत आहे, तेवढीच समस्या व दु:खेही वाढत आहे. स्त्रियांच्या सामाजिक प्रश्नांवर कायमस्वरूपी उपाय म्हणजे ग्रामगीता असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेविका सुधाताई जवंजाळ यांनी व्यक्त केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ४६ व्या पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन स्थानिक स्वराज्य भवनात करण्यात आले आहे. या महोत्सवादरम्यान महिला संमेलन आयोजित करण्यात आले आहे. यावेळी विचारपीठावर शैलजा गावंडे होत्या. प्रमुख वक्त्या म्हणून जयश्री सोनखासकर, भाग्यश्री देशमुख, डॉ. कल्याणी पदमने, डॉ. सामा तायडे, प्राजक्ता गवळी तसेच अतिथी म्हणून नगरसेविका मंगला म्हैसने, ज्योत्स्ना काकड, सीमा हरणे, निर्मला गावंडे, विद्या म्हैसने, साक्षी पवार, चराटे, चित्रलेखा म्हैसने, दीपाली पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सुधाताई देशमुख म्हणाल्या, की ग्रामगीातेच्या २0 व्या अध्यायात महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी गुरुमंत्र दिला आहे. या ग्रामगीतेत स्त्रियांच्या प्रश्नांची कशाप्रकारे उकल करून त्यांना आत्मनिर्भर करावे, याचा ऊहापोह करण्यात आला असून, स्त्रियांनी ग्रामगीतेचा अंगीकार करण्याचे आवाहन केले. भाग्यश्री देशमुख यांनी स्त्रियांच्या समस्येचा आलेख मांडला. समाजाने स्त्रियांच्या समस्यांबाबत चिंतन करून त्यांना अग्रस्थान द्यायला हवे असे त्यांनी सांगितले. कल्याणी पद्मने म्हणाल्या, की ध्यानधारणा व साधनेच्या माध्यमातून स्त्री आत्मिक सुखी होऊन आरोग्यमुक्त होते. स्त्रियांनी या धकाधकीच्या युगात आरोग्यावर लक्ष केंद्रित करून प्राणायामाचा अंगीकार करावा. साक्षी पवार यांनी युवतींसंदर्भात माहिती देत मुलींनी उज्वल भविष्य घडविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. मंगला म्हैसने यांनी स्त्रियांनी सामाजिक कार्यासोबतच शहर स्वच्छता व नागरी विकासासाठी प्रयत्न करायला हवे, असे सांगितले.