स्वच्छता अभियानावर विभागीय आयुक्तांची करडी नजर!
By Admin | Updated: October 29, 2014 00:33 IST2014-10-28T23:09:52+5:302014-10-29T00:33:16+5:30
स्थानिक स्वराज्य संस्थांचे योगदान पाहणार : जिल्हास्तरावरून मागविणार ऑनलाईन अहवाल.

स्वच्छता अभियानावर विभागीय आयुक्तांची करडी नजर!
संतोष मुंढे/ वाशिम
स्वच्छतेसाठी सरकारने हाती घेतलेल्या अभियानात जिल्हा प्रशासन तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचे योगदान कसे आहे, यावर विभागीय आयुक्तांची करडी नजर राहणार आहे. या मोहिमेसाठी वेळोवेळी केलेल्या उपक्रमांचा ऑनलाईन अहवाल आयुक्त कार्यालय मागविणार असून, त्याचा विभागस्तरावरही आढावा घेतला जाणार आहे. २ ऑक्टोबर २0१४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हातात झाडू घेवून भारत स्वच्छता अभियानाचा शुभारंभ केला. स्वच्छता अभियानात योगदान देण्याचे आवाहन त्यांनी सकल जनांना केले. प्रशासकीय यंत्रणाही याकामी लावण्यात आली असून, २ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान स्वत:चे कार्यालय व परिसर स्वच्छ करण्याची मोहिम प्रायोगिक तत्वावर हाती घेण्यात आली. या मोहिमेस व्यापक स्वरूप देण्यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व महापालिका आयुक्तांना दिशानिर्देश दिले होते. याबाबत २१ ऑक्टोबर रोजी विभागीय आयुक्तांकडून प्रगती अहवाल घेतल्यानंतर ही मोहीम आणखी गतीमान करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार विभागीय आयुक्तांनी जिल्हा पातळीवरुन अहवाल मागवित आले आहे. २९ ऑक्टोबर रोजी अमरावतीसह इतर भागांतून अशा प्रकारचा अहवाल येणार असल्याचे समजते. राज्यपाल, विभागीय आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार स्वच्छता अभियानाला गती देण्यात आली आहे. ३१ ऑक्टोबरपासून अभियान आणखी गतीमान करण्याचा कृती आराखडा तयार असून, अभियानाबाबत कुचराई आढळून आल्यास दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली.