एकात्मिक कृषी विकासाच्या नऊ प्रकल्पांना मान्यता
By Admin | Updated: May 18, 2015 01:23 IST2015-05-18T01:23:18+5:302015-05-18T01:23:18+5:30
सार्वजनिक-खासगी भागीदारीतील प्रकल्प.

एकात्मिक कृषी विकासाच्या नऊ प्रकल्पांना मान्यता
अकोला : राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सार्वजनिक व खासगी भागीदारी तत्त्वावर एकात्मिक कृषी विकासाच्या मूल्य साखळी प्रकल्पांतर्गत २0१५-१६ या वर्षासाठी पहिल्या टप्प्यात नऊ प्रकल्प राबविण्यास शासनामार्फत १५ मे रोजी मान्यता देण्यात आली. या प्रकल्पांमध्ये राज्यातील २७ जिल्हे समाविष्ट करण्यात आले आहेत. केंद्रीय कृषी मंत्रालयामार्फत राष्ट्रीय कृषी विकास योजनेत सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर एकात्मिक कृषी विकासासाठी विविध पिकांचे उत्पादन ते विक्री व्यवस्था असलेले मूल्य साखळी विकासाचे प्रकल्प राबविण्याकरिता संरचना निहित करण्यात आली आहे. त्यामध्ये राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत आर्थिक मदत देऊन, खासगी क्षेत्रातील संस्था व कंपन्यांच्या पुढाकाराने तसेच शेतकर्यांच्या सहयोगातून कृषी आणि संलग्न क्षेत्रात विविध पिकांचे उत्पादन ते विक्रीची व्यवस्था असलेली मूल्य साखळीची व्यवस्था उभारण्यात येणार आहे. त्यानुषंगाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत राज्यात सार्वजनिक व खासगी भागीदारीने २0१२-१३ पासून एकात्मिक कृषी विकासाचे प्रकल्प राबविण्यात येत आहेत. सन २0१५-१६ या वर्षात खरीप हंगामाच्या पृष्ठभूमीवर राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर एकात्मिक कृषी विकासाच्या मूल्य साखळी प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात नऊ प्रकल्प राबविण्यास मान्यता देण्यात येत असल्याचा निर्णय राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत १५ मे रोजी घेण्यात आला. ६४ कोटी ५९ लाख ५ हजार रुपये किंमत असलेल्या या नऊ प्रकल्पांमध्ये राज्यातील २७ जिल्हे समाविष्ट करण्यात आले आहेत.