‘८४ खेडी’ चालविण्याचा प्रस्ताव फेटाळला!
By Admin | Updated: April 9, 2017 01:41 IST2017-04-09T01:41:22+5:302017-04-09T01:41:22+5:30
मजीप्राने दिले जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाला पत्र.

‘८४ खेडी’ चालविण्याचा प्रस्ताव फेटाळला!
अकोला : खारपाणपट्टय़ातील गावांना पाणीपुरवठा करणारी ८४ खेडी प्रादेशिक योजना किमान पुढील चार महिने चालवावी, ७९ गावांचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवावा, असा जिल्हा परिषदेने दिलेला प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने फेटाळला आहे. योजना चालविणारच नाही, असेही स्पष्ट केल्याने जिल्हा परिषदेची गोची झाली आहे.
अकोट ८४ खेडी योजनेतून अकोट, अकोला, तेल्हारा तालुक्यातील ७९ गावांना पाणीपुरवठा केला जातो. योजनेच्या निर्मितीपासून देखभाल व दुरुस्ती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून सुरू आहे. गेल्यावर्षी २0१५-१६ च्या टंचाईमध्ये योजनेला निधी मंजूर करतानाच तो हस्तांतरित करण्याचेही शासनाने बजावले. त्यावेळी १0 कोटी २0 लाख ७0 हजार रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. टंचाई काळातील कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पूर्ण केल्यानंतर योजनेची देखभाल व दुरुस्ती, योजना व्यवस्थापन जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्याचे आदेशात नमूद होते. टंचाईतील विशेष दुरुस्तीची कामे ३१ मार्च २0१७ रोजी पूर्ण झाली. शासनाच्या आदेशानुसार, ही योजना जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्याचा मार्ग आधीच मोकळा होता. त्यामुळे जीवन प्राधिकरणाने जिल्हा परिषदेला १६ मार्च २0१७ रोजी पत्र दिले. त्यामध्ये १ एप्रिलपासून योजना हस्तांतरित करून घेण्याचे कळविण्यात आले. त्यानुसार ३१ मार्च रोजी रात्री १२ वाजतापासून जीवन प्राधिकरणाच्या यंत्रणेने पाणीपुरवठय़ाचे काम बंद करण्याचा पवित्रा घेतला.
ऐन उन्हाळ्यात योजना चालविण्याची जबाबदारी आल्याने पाणीपुरवठा विभाग अस्वस्थ झाला. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी विधळे यांनी बैठक घेत पर्यायावर विचार करण्याचे सांगितले. सोबतच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वरिष्ठांनाही पत्र दिले.
त्यावर दोन ते तीन दिवसांनंतर निर्णय घेण्याचेही सांगितले. त्याचवेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने शासन निर्णयाचा हवाला देत योजना हस्तांतरित करणे आवश्यक आहे. यापुढे ती जिल्हा परिषदेनेच चालवावी, असे पत्र देत प्रस्ताव फेटाळला.