विकास कामांना प्राधान्य द्या!
By Admin | Updated: March 10, 2017 02:38 IST2017-03-10T02:38:38+5:302017-03-10T02:38:38+5:30
पदग्रहण सोहळ्य़ात नवनियुक्त पदाधिकार्यांना खासदार संजय धोत्रे यांची सूचना.

विकास कामांना प्राधान्य द्या!
अकोला, दि. ९- शहरातील विकास कामे पाहून अकोलेकरांनी भाजपवर विश्वास दर्शवित महापालिका निवडणुकीत पक्षाला भरभरून मतरूपी दान दिले. सर्वसामान्य नागरिकांच्या सहकार्यामुळेच भाजपचा मनपातील सत्ता स्थापनेचा मार्ग सुकर झाला, याचे भान पक्षाच्या पदाधिकारी व नगरसेवकांनी ठेवणे अपेक्षित आहे. विकास कामांना प्राधान्य देऊन कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत राहा, अकोलेकर सदैव आपल्या पाठीशी उभे राहतील, अशी आशावादवजा सूचना खासदार संजय धोत्रे यांनी केली. महापौर, उपमहापौरपदाच्या पदग्रहण सोहळ्य़ाप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
नवनियुक्त महापौर विजय अग्रवाल, उपमहापौर वैशाली विलास शेळके यांचा पदग्रहण सोहळा गुरुवारी महापालिकेच्या आवारात आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर, जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात पाटील, महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील, सिद्धार्थ शर्मा, श्रावण इंगळे, माजी महापौर सुमन गावंडे, अश्विनी हातवळणे, सुहासिनी धोत्रे, वसंत खंडेलवाल, श्रीकृष्ण मोरखडे, रवी गावंडे, वसंत बाछुका, डॉ. किशोर मालोकार, धनंजय गिरीधर, संजय जिरापुरे, कारंजा न.प.चे माजी नगराध्यक्ष नरेंद्र गोलेच्छा, चंदा शर्मा, शिला खेडकर, सीमा मांगटे, गटनेता राहुल देशमुख, सुरेश अंधारे, डॉ. अशोक ओळंबे, डॉ. विनोद बोर्डे उपस्थित होते. महापालिका निवडणुकीत सर्व जातीसमूहांना एकत्र करून योग्य उमेदवारांना आम्ही तिकीट वाटप केले. भाजपने कधीही जातीपातीला थारा दिला नाही.
आम्ही सर्वांना सामावून घेतले आणि त्याचे सकारात्मक परिणामही समोर आल्याचे खा. संजय धोत्रे यांनी यावेळी सांगितले. अकोलेकरांनी भाजपला स्पष्ट बहुमत दिल्यामुळे समस्या मार्गी लावताना आता कोणत्याही सबबी चालणार नाहीत. शहराच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास पदाधिकारी व नगरसेवकांना ठेवावा लागेल. केंद्र व राज्यातून विकास कामांचा निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आमची असल्याचे खा. धोत्रे यांनी स्पष्ट केले.
शहरातील शेवटच्या घरापर्यंत विकास कामांची गंगा पोहोचवा, तरच आम्ही समाधानी राहू, असे सांगत खा. संजय धोत्रे यांनी जनतेचा पैसा सत्कारणी लावण्याची सूचना उपस्थित पदाधिकारी, नगरसेवकांना केली. शहराच्या गतवैभवाचे दिवस पुन्हा आणण्यासाठी विरोधी पक्षासह सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
तत्पूर्वी महापौर विजय अग्रवाल, उपमहापौर वैशाली शेळके यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विनोद बोर्डे यांनी तर आभार प्रदर्शन संजय जिरापुरे यांनी मानले.
आपण जनतेमुळे जिंकलो याचे भान ठेवा!
भाजपला मिळालेला ऐतिहासिक विजय हा केवळ जनतेमुळे मिळाला याचे भान ठेवा. विकास कामांना प्राधान्य देऊन समस्या तडीस न्या. तरच जनतेचा विश्वास आपण सार्थकी लावल्याचे समाधान मिळेल, अशा शब्दात ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा यांनी नवनियुक्त महापौर, उपमहापौरांसह उपस्थित नगरसेवकांना मार्गदर्शन केले. अक ोलेकरांसोबतच पक्षानेदेखील योग्य व पात्र उमेदवारांवर विश्वास ठेवला. उमेदवारांच्या विजयात पक्षाचा मोलाचा वाटा आहे, हे विसरू नका. शहरातील स्लम एरियांना प्राधान्य देऊन मूलभूत सुविधांसह कल्याणकारी योजना पोहोचविण्याचे आवाहन आ. शर्मा यांनी यावेळी केले.
अकोलेकरांमुळे गाठला 'मॅजिक फिगर'
भाजपला स्पष्ट बहुमत द्या, तुमच्या शहराच्या सर्वांंगीण विकासाची जबाबदारी माझी, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोलेकरांना आश्वासन दिले होते. भाजपच्या वतीने सुरू असलेल्या विकास कामांना लक्षात घेऊनच नागरिकांनी पक्षाच्या उमेदवारांवर विश्वास ठेवत मतांचे दान दिले. स्वप्नातही विचार करू शकत नव्हतो, अशी ह्यमॅजिक फिगरह्ण केवळ अकोलेकरांमुळे गाठणे शक्य झाल्याचे आमदार रणधीर सावरकर यांनी बोलताना सांगितले. पाणीपुरवठा वितरण प्रणालीचे काटेकोर नियोजन करून योजना निकाली काढण्याचा सूचनावजा सल्ला आ. सावरकर यांनी दिला.