शब्दांची आनंदयात्रा घडवणारा कवी..

By Admin | Updated: July 21, 2015 01:10 IST2015-07-21T01:10:30+5:302015-07-21T01:10:30+5:30

आनंदयात्री प्रसाद कुलकर्णी यांची लोकमतशी दिलखुलास बातचीत.

Poem poet | शब्दांची आनंदयात्रा घडवणारा कवी..

शब्दांची आनंदयात्रा घडवणारा कवी..

नितीन गव्हाळे / अकोला : बालपणापासून त्याला शब्दांचे वेड होतं. रद्दीच्या कागदातसुद्धा तो कविता शोधायचा. त्याला कविता कळू लागल्यापासून त्याने कवीच व्हायचं ठरवलं. कविता, तिचे शब्द त्याच्या रक्तपेशींमध्ये धावायला लागले. प्रसादरूपी शब्द त्याच्या हातातून बाहेर पडून कागदांवर उमटू लागले. कविता ही ईश्‍वराची देण आहे. तिला दु:खाचा मुलामा न चढविता, आनंदाचा, हर्षाचा, प्रेमाचा, सौंदर्याचा आणि भव्यतेचा मुलामा चढविला आणि रसिकमनांना शब्दांची आनंदयात्रा घडवून आणली. शब्दांमधुनी आनंद पेरणारा, खळखळून हसवणारा कवी आहे, प्रसिद्ध कवी, प्रसाद कुलकर्णी. शुभेच्छांचा सौदागर, आनंदयात्री, शुभेच्छा एक्स्प्रेस अशा कितीतरी नावांनी महाराष्ट्राला परिचित असणारा प्रसाद कुलकर्णी सोमवारी कलर्स प्रस्तुत सखी मंच ह्यरिमझिम गाणी झलक सुहानीह्ण कार्यक्रमासाठी अकोल्यात आला होता. यावेळी प्रसादने लोकमतशी दिलखुलास बातचीत केली. प्रसाद मूळचा कोकणातील कणकवलीचा. प्रसादचे वडील मोहन कुलकर्णी पोस्टमास्तर आणि आई प्रतिभा एक शिक्षिका. प्रसादमागे आज मोठमोठी विशेषणं लागतात. यामागे त्याची साधना, तपश्‍चर्या मोठी आहे. आनंदाचा ध्यास घेत त्याने संकटं, दु:ख, विवंचना, शारीरिक व्याधी, अपघात आणि संघर्षाचा सामना केला. रसिकांच्या मनात आनंद, हर्ष निर्माण करायचा ध्यासच त्याने घेतला. त्याच्या कवितेतील शब्द रसिकांच्या मनाला आनंद देऊ लागले. त्याच्या एकेक कविता रसिकांना आनंदयात्रा घडवू लागल्या. प्रसादने आतापर्यंत आनंदयात्रेचे ५५0 प्रयोग केले. मराठी साहित्याच्या अत्युच्च शिखरावर प्रसाद जाऊन पोहोचला. शब्दांमध्ये परिवर्तनाची एक ताकद आहे. शब्दांनी मन बदलल्याचा अनुभव त्याने घेतला. शब्दांमुळे माणूस बदलत असेल तर त्याहून दुसरे मोठे कर्म ते कोणते..?

असा बनला शुभेच्छांचा सौदागर..

प्रसादला बालपणी लग्न, वाढदिवस, निरोप समारंभात गेल्यावर मराठी माणसांच्या हातात इंग्रजी शुभेच्छापत्र पाहून आश्‍चर्य वाटायचं. या शुभेच्छापत्रांच्या आड तो निरागस शब्दांची गुंफण असलेली कविता लपवायचा. सुरुवातीला नामांकित ग्रिटिंग्ज कंपन्यांकडे प्रसाद गेला; पण त्याला अक्षरश: हुसकावून लावले. मराठी शुभेच्छापत्र असू शकतं हेच त्यांना पटत नव्हते. १९९८ मध्ये किरण जैन या मित्राने मराठी शुभेच्छापत्रांची संकल्पना त्याच्यासमोर मांडली. तेव्हा या दोघांनाही ही कल्पना भन्नाट लोकप्रिय होईल, असे वाटले नाही. सगळय़ात पहिलं शुभेच्छापत्र त्यानं आईच्या वाढदिवसाला लिहिलं. मग त्याने वडिलांसाठी लिहिलं. साशंक मनाने किरण जैन यांनी शुभेच्छापत्र बाजारपेठेत आणलं आणि आश्‍चर्य म्हणजे वाचकांच्या उड्या पडू लागल्या.

स्मार्टफोनमुळे लिखित शुभेच्छापत्रांची क्रेझ कमी झाली

     काळाची पाऊले तुम्ही थोपवू शकत नाही. काळाच्या ओघात बदल होणारच. स्मार्टफोन आल्यामुळे लिखित शुभेच्छापत्रांची क्रेझ कमी झाली खरी; परंतु मागणी कमी झालेली नाही. स्मार्टफोनवरही मराठी शुभेच्छापत्र आपलं स्थान टिकवून असल्याचं प्रसाद म्हणतो. स्मार्टफोनवरही मराठी शुभेच्छापत्रांच्या माध्यमातून त्याचे शब्द रसिकांना साद घालतातच. कविता, गाणी, माणसं, प्रेम आणि तुटलेली मने जुळविण्यामध्ये त्याचे शब्द मोलाची भूमिका वठवित असल्याचं प्रसाद ठासून सांगतो.

Web Title: Poem poet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.