प्रवाशांनो, धावत्या गाडीत आता लगेच दाखल करा तक्रार
By Admin | Updated: July 14, 2015 02:06 IST2015-07-14T02:06:56+5:302015-07-14T02:06:56+5:30
रेल्वे प्रशासनाचे आवाहन; जीआरपी व आरपीएफ जवानांव्यतिरिक्त कोच अटेंडन्ट, गार्ड, कंडक्टर येईल मतदतीला धावून.

प्रवाशांनो, धावत्या गाडीत आता लगेच दाखल करा तक्रार
राम देशपांडे / अकोला- धावत्या गाडीमध्ये साहित्य चोरी किंवा दरोड्यासोबतच महिला छेडखानीच्या घटना घडल्यास, त्यासंदर्भात पोलीस तक्रार (एफआयआर) दाखल करण्यासाठी प्रवाशांना जवळच्या स्थानकावरील रेल्वे पोलीस ठाणे गाठावे लागत होते. रेल्वे प्रशासनाने १0 जुलै पासून प्रवाशांच्या सुविधेखातर धावत्या गाडीमध्ये ताबडतोब तक्रार दाखल करण्याच्या प्रक्रियेस प्रारंभ केला आहे. अशा अटीतटीच्या प्रसंगी जीआरपी किंवा आरपीएफ पोलीसांव्यतिरिक्त कोच कन्डक्टर, रेल्वे कोच अटेंडन्ट, किंवा गाडीचा गार्ड हे देखील घटनेची तक्रार दाखल करण्यासाठी ग्राहय़ धरले जाणार आहे. धावत्या रेल्वे गाड्यांमध्ये घडलेल्या बहुतांश चोरीच्या आणि दरोड्याच्या घटनांमधील आरोपींचा शोध घेण्यास रेल्वे पोलीस अपयशी ठरतात. जवळच्या रेल्वे स्थानकावरील जीआरपी किंवा आरपीएफ पोलीसांकडे फिर्याद दाखल केल्यानंतर सुरू होणारा पोलीस तपास या प्रक्रियेत अधिक वेळ जात असल्याने, बहुतांश घटनांमधील आरोपी पोबारा होण्यास यशस्वी ठरतात. अशा घटनांसंदर्भात प्रवाशांना धावत्या गाडीमध्येच तक्रार दाखल करता येईल व तात्काळ आरोपीस वेसण घालता येईल या दृष्टीकोनातून गत अर्थसंकल्पात केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी तरतूद केली होती. तर लवकरच ही सुविधा सुरू होणार असल्याची घोषणा सुरेश प्रभू यांनी एप्रिल-१५ मध्ये केली होती. संपूर्ण देशभरात १0 जुलै पासून या निर्णयाची अमलबजावणी सुरू करण्यात आली असल्याची माहिती आहे. यापुढे धावत्या गाडीमध्ये साहित्य चोरी, दरोडा किंवा महिल छेडखानी किंवा इतर कुठलिही अप्रिय घटना घडल्यास, प्रवाशांना तात्काळ त्याच गाडीमध्ये कर्तव्यावर असलेल्या आरपीएफ किंवा जीआरापी पोलीसाजवळील तक्रार रजिस्टरमध्ये लेखी फिर्याद दाखल करता येणार आहे. अशा अतितटीच्या प्रसंगी जीआरपी किंवा आरपीएफ पोलीस उपलब्ध नसल्यास, घटनेची फिर्याद दाखल करून घेण्याचा अधिकार कोच कन्डक्टर, कोच अटेंडन्ट व गार्डला देण्यात आले आहेत. याकरीता संबंधित अधिकार्यांकडे हिंदी आणि इंग्रजीमध्ये छापील स्वरूपातील एफआयआय अर्ज उपलब्ध राहणार आहेत. तक्रार दाखल होताच त्याबाबतची माहिती संबंधित अधिकारी पुढील रेल्वे स्थानकावरील जीआरपी किंवा आरपीएफ पोलिसांना देतील. आणि त्या स्थानकावर गाडी पोहोचण्यापूर्वीच रेल्वे पोलीस सापळा रचतील. सद्याच्या घटकेला आरपीएफ पोलीस १३00 गाड्यांमध्ये व जीआरपी पोलीस २ हजार २00 गाड्यांमद्ये नियमित तपासणी करण्याचे कार्य करीत असल्याची माहिती आहे. सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन या माध्यमातून रेल्वे अधिकार्यांनी केले आहे.