सेंद्रिय शेतीला कृतीतून चालना!
By Admin | Updated: July 14, 2014 01:24 IST2014-07-14T00:14:14+5:302014-07-14T01:24:16+5:30
सेंद्रिय शेतीचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात सेंद्रिय शेती प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.

सेंद्रिय शेतीला कृतीतून चालना!
अकोला : सेंद्रिय शेतीचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात सेंद्रिय शेती प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. आतापर्यंत ६८ शेतकर्यांनी येथून सेंद्रिय शेती प्रशिक्षण प्रमाणपत्र (पदविका) ग्रहण केली असून, त्यांनी दज्रेदार सेंद्रिय पिके व पदार्थ निर्मितीला सुरुवात केली आहे.
सर्वच पिकांमध्ये वाढलेला कीटकनाशक रसायनाचा वारेमाप वापर मानवी आरोग्याला घातक ठरू लागला आहे. हा वापर कमी करण्यासाठी विविध पातळीवरू न शेतकर्यांचे प्रबोधन करण्यात येत आहे. असे असले तरी, रसायनाचा हा वापर कमी न होताच अधिक वाढला आहे. या सर्व पृष्ठभूमीवर शेतकर्यांना कृतीतून सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण व या माध्यमातून या विषयाची आवड निर्माण होण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सेंद्रिय शेती (पदविका) प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला आहे. येथून प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या विद्यार्थी, शेतकर्यांनी सेंद्रिय पिके घेणे सुरू केले असून, यावर आधारित उद्योग सुरू केले आहेत.
सेंद्रिय शेती पदविका अभ्यासक्रमासह सेंद्रिय शेती प्रशिक्षण वर्गावरदेखील भर देण्यात येत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व भारत सरकारच्या विभागीय सेंद्रिय शेती केंद्र नागपूरच्यावतीने विदर्भातील शेतकर्यांसाठी सेंद्रिय शेती प्रशिक्षण वर्गाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. सेंद्रिय पदार्थांना उपलब्ध असलेली आंतरराष्ट्रीय बाजारपेठ लक्षात घेता, भारतीय सेंद्रिय उत्पादने, पदार्थांना मोठा वाव आहे. राज्य सरकारने सेंद्रिय शेती प्रोत्साहन योजनेद्वारे सेंद्रिय शेतीला पाठबळ दिले आहे. असे असले तरी या शेतीचा प्रसार अधिक गतीने होण्यासाठी शेतकर्यांना कृतीतून सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण दिल्याशिवाय गत्यंतर नाही. यासाठीच नव्याने सेंद्रिय शेतीवर भर देण्यात येत आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातून सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण घेणारी तिसरी तुकडी बाहेर पडली आहे. या अभ्यासक्रमाद्वारे विदर्भात प्रशिक्षित शेतकरी निर्माण करण्याचे धोरण यशस्वी ठरत आहे. अकोला जिल्हय़ातील शेतकर्यांनी या माध्यमातून स्वत:चे उद्योग सुरू केले आहेत. यात तेल्हारा तालुक्यातील महिला शेतकर्यांचा समावेश आहे.