एक होतं गाव..

By Admin | Updated: September 8, 2014 01:10 IST2014-09-08T00:54:45+5:302014-09-08T01:10:45+5:30

विकासाअभावी गाव झालं उजाड; तेल्हारा तालुक्यातील कळमखेड झालं एका व्यक्तीचं गाव.

One is the village .. | एक होतं गाव..

एक होतं गाव..

सदानंद खारोडे/ तेल्हारा
कधीकाळी संपन्न असलेलं तेल्हारा तालुक्यातील एक लहानसं गाव पार उजाड झालं आहे. स्वातंत्र्योत्तर काळात या गावाकडे प्रशासनाने लक्षच दिले नाही. त्यामुळे गावाचा विकास होऊ शकला नाही. परिस्थिती एवढी बिकट झाली की, अख्ख गावंच उजाड झालं. ग्रामस्थांना या गावातून स्थलांतर करणे भाग पडले. आजमितीस या गावात केवळ एकच व्यक्ती वास्तव्य आहे. या एका ग्रामस्थासाठी शासनानं स्वतंत्र पोलिस पाटील नेमण्याची कृपा केली, एवढं मात्र खरं.
सातपुड्याच्या जवळच शेतकरी व शेतमजुरांच्या ५0 कुटुंबांचा समावेश असलेल्या कळमखेड गावात हिंदू-मुस्लिम गुण्यागोंविदाने राहायचे. सामाजिक एकतेचे प्रतिक असलेल्या या गावात दोन्ही धर्मियांची धर्मस्थळं आहेत. गावातील घरांची पडझड झाली आहे. विहिरी खचल्या असून, केवळ दोन घरं कशीबशी तग धरून आहेत. गावात दूषित पाणी पुरविणारी, एक कूपनलिका आहे. गावात आजपर्यंत कोणताही शासकीय अधिकारी पोहोचला नाही. रस्ता, पथदिवे, शौचालय नाही; शाळा, आरोग्य केंद्र आणि समाजमंदिर तर दूरच राहिले. आजूबाजुचा ३६ एकर परिसर काटेरी झाडाझुडपांनी व्यापला आहे. गावात रस्ताच नसल्याने, गावकर्‍यांनी १९७२ साली मातीचा भराव टाकून दोन किलोमीटर लांबीचा रस्ता तयार केला हो ता; परंतु त्यानंतर साधा रस्ताही कुणी केला नाही. त्यामुळे विवाह समारंभाकरीताही गावामध्ये पाहुणे येण्यास टाळाटाळ करायचे. त्यामुळे गावाची अवस्था हळुहळू आणखी बकाल झाली. कालांतराने येथील गावकर्‍यांनी स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. तळेगाव बाजारपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असल्याने, काही गावकरी तळेगाव बाजार, काही खंडाळा, तर काही अकोली येथे राहण्यास गेले; मात्र त्यांची घरं अद्यापही कळमखेड येथे कायम आहेत. गाव उजाड असलं तरी, शासनाने इथे वर्षा बोदडे नामक पोलिस पाटील नेमला आहे. गावात सध्या केवळ प्रल्हाद बोदडे नामक ग्रामस्थ वास्तव्यास असून, तोच या गावाची रखवाली करीत आहे. एक ना एक दिवस विकासाची गंगा गावात येईल, या आशेने गावाची वेस ओलांडण्याचे तो टाळत आहे. येथून स्थलांतर केलेल्या ग्रामस्थांनी, नव्या गावची मतदान ओळखपत्रे बनविली आहेत; मात्र ७ गावकर्‍यांची ओळखपत्र अद्यापही कळमखेडच्या नावानेच आहेत. ह्यगड्या आपला गाव बराह्ण असे म्हणत विकासाचा सूर्य कधी ना कधी उगवेल, अशी आशा त्यांनाही आहे.
अकोली रूपराव येथील सरपंच जनार्दन ढोकणे यानी
कळमखेड गावात सध्या एकच रहिवासी असल्याने, या गावात विकासाची कोणतीही कामे केली जात नसल्याचे सांगत गावाची लोकसंख्या वाढल्यास, विकासाला प्राधान्य दिले जाईल,
असे म्हणाले. तर तेल्हारा येथील तहसीलदार यांनी
तहसील कार्यालयाच्या दफ्तरी कळमखेड गावांची उजाड म्हणून नोंद नाही; परंतु या गावाला भेट देऊन माहिती अवगत करू. येथील समस्या सोडविण्यासाठी वरिष्ठ अधिकार्‍यांकडे अहवालही पाठवू, असे सांगीतले.

** प्रत्येक निवडणुकीत मतदान
निवडणुकीच्या काळात गावात पुढार्‍यांच्या, अधिकार्‍यांच्या गाड्या पोहचतात. आश्‍वासनांची खैरात वाटली जाते, त्यानंतर एकदाची निवडणूक संपली, की मग कुणीही गावाकडे वळून पाहत नाही. याच कारणामुळे गावकरी लगतच्या गावांमध्ये वास्तव्यास गेले आहेत. गावाची ओढ असलेल्या प्रत्येकाजवळ याच गावचे मतदान ओळखपत्र आहे. ते प्रत्येक निवडणुकीत मतदानासाठी गावात आवर्जून येतात.

Web Title: One is the village ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.