पोषण आहाराची खिचडी शिजलीच नाही!
By Admin | Updated: May 26, 2015 02:39 IST2015-05-26T02:39:55+5:302015-05-26T02:39:55+5:30
१७५ शाळांची पाहणी; अकोला जिल्ह्यातील विदारक स्थिती; शासनाचा निधी पाण्यात.

पोषण आहाराची खिचडी शिजलीच नाही!
अकोला : शासनाद्वारे शालेय पोषण आहार योजनेसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत असतानाही उन्हाळी सुट्यांमध्ये आहार योजनेचा बट्टय़ाबोळ झाल्याचे वास्तव ह्यलोकमतह्णने सोमवारी जिल्ह्यातील १७५ शाळांमध्ये केलेल्या स्टिंग ऑपरेशनच्या माध्यामातून उजेडात आणले आहे. शाळांना उन्हाळय़ाच्या सुट्या असल्याने विद्यार्थी आहार ग्रहणासाठी येत नसल्याचा दावा शिक्षकांमधून करण्यात आला असला, तरी पालकांमध्ये जागृती करण्यात आणि विद्यार्थ्यांना आहाराची गोडी लावण्यात शिक्षक आणि शाळा व्यवस् थापन समित्यांना अपयश आल्याचेही प्रकर्षाने दिसून आले. विद्यार्थ्यांना शिक्षणाची ओढ लागावी, त्यांनी वर्षभर शाळेत यावे, यासाठी शासनातर्फे विविध योजना राबविण्यात येतात. विद्यार्थी शारीरिकदृष्ट्या सक्षम व्हावे, यासाठी शासनातर्फे शालेय पोषण आहार योजना राबविण्यात येत आहे. उन्हाळ्याच्या सुटीतही पोषण आहाराचे वितरण करण्यात यावे, असा आदेशही शासनाने जारी केला. या आदेशाची अंमलबजावणी होते की नाही, याची चाचपणी ह्यलोकमतह्ण चमूने सोमवारी स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून केली. जिल्ह्यातील बहुतांश शाळा समित्यांनी उन्हाळाच्या सुटीमध्ये विद्यार्थी येत नसल्याने पोषण आहार शिजविण्यात येऊ नये, असा ठराव घेतला. या ठरावाची माहितीही शिक्षण विभागाला देण्यात आली. त्यामुळे शिक्षकही बिनधास्त असल्याचे चित्र पहावयास मिळाले. त्यामुळे शालेय पोषण आहार योजनेबाबत आता विद्यार्थी, पालकांप्रमाणेच शिक्षकांमध्येही जनजागृती करणे आवश्यक आहे, यावर स्टिंग ऑपरेशनच्या निमित्ताने शिक्कामोर्तब झाले.