राष्ट्रसंतांचे विचार साहित्य संमेलन हे आता कृती संमेलन व्हावे- हरिभाऊ वेरूळकर
By Admin | Updated: December 14, 2014 23:42 IST2014-12-14T23:42:32+5:302014-12-14T23:42:32+5:30
‘है प्रार्थना गुरुदेव से यह स्वर्गसम संसार हो.’ या शांतीपाठाने अकोला येथील संमेलनाचा समारोप.

राष्ट्रसंतांचे विचार साहित्य संमेलन हे आता कृती संमेलन व्हावे- हरिभाऊ वेरूळकर
अकोला : राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलनाची रविवार, १४ डिसेंबर रोजी सायंकाळी सर्वधर्मीय प्रार्थनेने सांगता झाली. प्रारंभी एकात्मतेचा मंत्र देणार्या सर्वधर्मीय प्रार्थना झाल्या. यानंतर हजारो नागरिक आणि गुरुदेव सेवा मंडळ कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ह्यहै प्रार्थना गुरुदेव से यह स्वर्गसम संसार हो..ह्ण हा शांतीपाठ झाला. राष्ट्रभक्ती आणि शांततेचा मंत्र देणार्या या प्रार्थनेमुळे परिसर मंत्रमुग्ध झाला होता. त्यानंतर समारोप्रसंगी बोलताना संमेलनाध्यक्ष हरिभाऊ वेरूळकर यांनी राष्ट्रसंतांचे विचार साहित्य संमेलन हे आता कृती संमेलन झाले पाहिजे,असे विचार व्यक्त केले.
समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री सुधाकरराव गणगणे होते. संमेलनाध्यक्ष आचार्य हरिभाऊ वेरूळकर, स्वागताध्यक्ष डॉ. गजानन नारे आदींची प्रमुख उपस्थिती होती. ज्या महानुभावांचे संपूर्ण राज्यात नाव आहे, त्यांनी या तीन दिवसीय राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलनात परिसंवादाच्या माध्यमातून आपणास विचारांची शिदोरी दिली. ही शिदोरी सोबत नेल्यानंतर तिचे कृतीत रूपांतर करण्याची खरी गरज असल्याचे प्रतिपादन यावेळी गणगणे यांनी केले. संमेलनाध्यक्ष म्हणून बोलताना आचार्य हरिभाऊ वेरूळकर म्हणाले की, साहित्य संमेलनाचे वेगवेगळे प्रवाह आहेत. राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलन हे सर्व संतांच्या विचारांचे व्यासपीठ असून, सर्व संतांचा आदर्श म्हणजे ग्रामगीता असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. विविध परिसंवाद व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून राष्ट्रसंतांचे विचार समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला; पण आता राष्ट्रसंतांचे विचार साहित्य संमेलन कृती संमेलन व्हावे, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. आभार डॉ. गजानन नारे यांनी मानले.