नवीन संशोधनामुळे देशाचा विकास
By Admin | Updated: December 22, 2014 01:07 IST2014-12-22T01:07:27+5:302014-12-22T01:07:27+5:30
रणजित पाटील यांचे प्रतिपादन, शिवाजी महाविद्यालयात विविध सत्रामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.

नवीन संशोधनामुळे देशाचा विकास
अकोला - नवनवीन तंत्रज्ञान ज्या प्रमाणे विकसित होत आहे, त्याचा अवलंबही मोठय़ा झपाट्याने सुरू आहे. जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी आणि देशाच्या विकासासाठी नवीन संशोधन अत्यंत महत्त्वाचे असून, यामुळेच देश विकासाच्या प्रगतीपथावर जाणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे नागरी विकास व गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी रविवारी येथे आयोजित कार्यक्रमात केले. यावेळी विविध सहा सत्रात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, डॉ. होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र मुंबई व टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दुसर्या विज्ञान परिषदेला भेट दिली. त्यावेळी राज्यमंत्री डॉ. पाटील बोलत होते. या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक सोनवणे, प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे, उपशिक्षणाधिकारी राजेंद्र भाकरे, उपप्राचार्य डॉ. एस. पी. देशमुख, प्रा. उदय देशमुख उपस्थित होते.
शिवाजी महाविद्यालयात आयोजित विज्ञान परिषद व प्रदर्शनाला रविवारी विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यामध्ये सातव्या सत्रामध्ये डॉ. नरेंद्र देशमुख यांनी पंच अध्ययन प्रक्रिया आणि पृच्छा प्रक्रिया यावर आधारित विविध बाबींवर मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी हा आधार कसा महत्त्वाचा आहे, हे रचनावाद, परिवर्तनवादाद्वारे विविध बाबींच्या माध्यमातून व चाचण्या घेऊन स्पष्ट केले. त्यानंतर ८ व्या सत्रात हेमंत नागवलकर यांनी कृतिशील शिक्षण या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.