अकोला शहरातील मालमत्ता कर थकबाकीदारांची नावे होणार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 15:49 IST2018-10-10T15:48:50+5:302018-10-10T15:49:23+5:30
महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी शहरातील मोठ्या थकबाकीदारांची नावे वृत्तपत्रांच्या माध्यमातून जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.

अकोला शहरातील मालमत्ता कर थकबाकीदारांची नावे होणार जाहीर
अकोला: महापालिकेच्या सुधारित दरवाढीला शिवसेना, काँग्रेस व भारिप-बमसंने आक्षेप घेतल्यामुळे टॅक्सचे दर कमी होतील, या अपेक्षेतून करबुडव्या मालमत्ताधारकांनी टॅक्सची थकीत रक्कम जमा करण्यास हात आखडता घेतला आहे. चालू व थकीत मालमत्ता कराच्या एकूण १०५ कोटींपैकी आजवर मनपाच्या मालमत्ता कर वसुली विभागाने केवळ २० कोटींची वसुली केल्याची माहिती आहे. अशा स्थितीत महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी शहरातील मोठ्या थकबाकीदारांची नावे वृत्तपत्रांच्या माध्यमातून जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.
महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेल्या मालमत्तांचे १९९८ पासून ते २०१६ पर्यंत पुनर्मूल्यांकन रखडले होते. परिणामी, मनपाला कोट्यवधी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. उत्पन्नात वाढ केल्याशिवाय विकास कामांसाठी निधी देणार नसल्याचे राज्य शासनाने सुनावल्यानंतर प्रशासनाने मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला. ‘स्थापत्य’ कन्सलटन्सीच्या माध्यमातून ‘जीआयएस’ प्रणालीद्वारे मालमत्तांचे सर्वेक्षण, मोजमाप करून सुधारित करवाढ लागू करण्यात आली. यादरम्यान, मनपाच्या करवाढीवर आक्षेप नोंदवत विरोधी पक्ष काँग्रेस, शिवसेना, भारिप-बमसंने शासनाकडे तक्रारी करीत नागरिकांना जुन्या दरानुसार टॅक्सची रक्कम जमा करण्याचे आवाहन केले. याचा परिणाम मालमत्ता कर वसुलीवर झाला असून, १०५ कोटी रकमेपैकी तब्बल ८५ कोटींची रक्कम जमा करण्यास अकोलेकरांनी हात आखडता घेतल्याचे समोर आले आहे.
वसुली पथकावर प्रश्नचिन्ह
मनपाने सुधारित करवाढ लागू केल्यानंतर चालू आर्थिक वर्षात मनपासमोर ५९ कोटी रुपये कर वसुलीचे उद्दिष्ट होते. यापैकी क र वसुली निरीक्षकांनी केवळ १३ कोटी वसूल केले. थकबाकीचा आकडा ४६ कोटी असून, यापैकी फ क्त ७ कोटींची रक्कम वसूल झाली. चालू आर्थिक वर्ष व थकबाकीची एकूण रक्कम पाहता अवघा २० टक्के टॅक्स वसूल झाल्याचे चित्र आहे. हा प्रकार पाहता मनपाच्या कर विभागातील जप्ती व वसुली पथकांची निष्क्रियता चव्हाट्यावर आली आहे.
वसुली निरीक्षकांची कमतरता
मनपाने सुधारित करवाढ केल्याने उत्पन्नाचा आकडा वाढल्याचे दिसून येते. शहराचा झालेला विस्तार पाहता टॅक्सची रक्कम वसूल करण्यासाठी मालमत्ता कर वसुली विभागाकडे कर्मचाऱ्यांची तोकडी संख्या आहे. यासंदर्भात कर अधीक्षक विजय पारतवार यांनी सामान्य प्रशासन विभागाकडे कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणी केल्याची माहिती आहे.
सुधारित देयकांचे होणार वाटप
मनपा प्रशासनाने हद्दवाढीत सामील झालेल्या नवीन प्रभागातील मालमत्तांचा सर्व्हे केला. यावेळी नवीन प्रभागांमध्ये ४९ हजार मालमत्तांची नोंद करण्यात आली असून, संपूर्ण शहरात आज रोजी १ लाख ५४ हजार मालमत्तांची अधिकृत नोंदणी करण्यात आली आहे. नवीन प्रभागांमध्ये १० आॅक्टोबरपासून सुधारित देयकांचे वाटप केले जाणार आहे.