मराठी रंगभूमीला अष्टपैलू आणि हरहुन्नरी कलाकारांची गरज

By Admin | Updated: May 30, 2015 01:54 IST2015-05-30T01:54:32+5:302015-05-30T01:54:32+5:30

लोकमत मुलाखत : मराठी नाट्य व सिनेकलाकार भरत जाधव यांचे मत.

The Marathi theatrical needs of all-round and every Hoonuni artists | मराठी रंगभूमीला अष्टपैलू आणि हरहुन्नरी कलाकारांची गरज

मराठी रंगभूमीला अष्टपैलू आणि हरहुन्नरी कलाकारांची गरज

राम देशपांडे/ अकोला: लोकमत सखी मंचतर्फे आयोजित श्रीमंत दामोदर पंत या धमाल विनोदी नाटकाच्या सादरीकरणानिमित्त बुधवार, २७ मे रोजी प्रथमच अकोल्यात आलेले विनोदी कलाकार भरत जाधव यांनी लोकमतशी दिलखुलास गप्पा मारल्या. मराठी नाटक आणि चित्रपटसृष्टी अजरामर ठेवण्यासाठी अष्टपैलू आणि हरहुन्नरी कलाकारांची गरज असून, वैदर्भीय कलाकारांमध्ये हे सर्व गुण ठासून भरले असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. आजतागायत ८५ चित्रपट, ८ मालिका आणि ८५00 हून अधिक नाट्यप्रयोग करणार्‍या भरत जाधवांनी यावेळी वैदर्भीय तरुणाईला नव्या ताकदीने रंगभूमीशी नाते जोडण्याचे आवाहनदेखील केले.

प्रश्न : आपल्या कारकिर्दीचा श्रीगणेशा कसा झाला?

भरत : मंगेश दत्त हे माझ्या भावाचे मित्र. त्यांच्या ओळखीतून मला १९८५ मध्ये महाराष्ट्राची लोकधारा या लोकनृत्य कार्यक्रमात कला सादर करण्याची पहिली संधी मिळाली आणि माझ्या कारकिर्दीचा श्रीगणेशा झाला. शाहीर साबळे हे माझे गुरू. त्यांचा नातू केदार शिंदे, अंकुश चौधरी आणि संतोष पवार या सर्वांनी मिळून आमचा एक ग्रुप तयार झाला होता. या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही धमाल कार्यक्रमांना सुरुवात केली.

प्रश्न : रंगभूमीवर प्राप्त केलेला पहिला पुरस्कार कोणता?त्याबद्दलचा अनुभव सांगता येईल?

भरत : मी व अंकुश चौधरीने परळच्या महर्षी दयानंद महाविद्यालयात प्रवेश घेतला, नंतर लगेचच महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेमध्ये प्लॅन्चेट नावाची एकांकिका सादर केली. त्या एकांकिकेला सर्वोत्कृष्ट एकांकिकेचा पुरस्कार मिळाला. त्यावेळी जवळजवळ दहा वर्षांनी महर्षी दयानंद महाविद्यालयाने पुरस्कार खेचून आणला. नंतर देवेंद्र पेमनी आम्हाला ऑल दि बेस्टची संकल्पना सांगितली. या एकांकिकेलादेखील प्रथम पारितोषिक मिळाले. चंद्रकांत कुलकर्णी व महेश मांजरेकर यांनी मोहन वाघ यांना ही एकांकिका नाटक रूपात व्यावसायिक रंगभूमीवर आणण्याचा आग्रह धरला.

प्रश्न : विदर्भातील कलाकार मुंबई-पुण्याकडे धाव घेताना दिसून येतात. विदर्भातदेखील मराठी रंगभूमीला मानाचे स्थान मिळावे, याकरिता कोणते प्रयत्न व्हावयास हवेत, असे तुम्हाला वाटते?

भरत : मराठी नाटक आणि चित्रपट सृष्टी अजरामर ठेवण्यासाठी अष्टपैलू आणि हरहुन्नरी कलाकारांची गरज आहे. वैदर्भीय कलाकारांमध्ये हे सर्व गुण ठासून भरले असल्याचे मी जवळून अनुभवले आहे. त्यामुळे मराठी रंगभूमीला कशाची भीती नाही. मी पहिल्यांदाच अकोल्यात आलो आहे. राज्यात असे अनेक भाग आहेत, ज्या भागात कलाकार अद्याप पोहोचलेच नाहीत. केवळ दृकश्राव्य माध्यमांवर विसंबून राहता कामा नये. राज्याच्या प्रत्येक कानाकोपर्‍याचा ठाव कलाकारांनी घ्यायला हवा.

प्रश्न : आधी नाटक की, आधी सिनेमा? प्रथम स्थान कुणाला द्याल?

भरत : माझ्या मते, मालिका किंवा कॅमेरासमोर कला सादर करणे, हे कठीण काम आहे. अँक्शन-रिअँक्शनचा सर्व खेळ नाटक सादर करताना अनुभवता येतो. नाटकात तुम्ही केलेल्या कामाला प्रेक्षकांची त्वरित दाद मिळते. मालिका व चित्रपटाच्या माध्यमात काम करताना, आपण एकदा केलेली भूमिका परत वठवता येत नाही. त्यामुळे काही चुका झाल्या असतील, तर त्या परत दुरुस्त करणे अश्यकच. त्यामुळे कलाकारांनी केवळ एका गोष्टीवर विसंबून राहता कामा नये.

प्रश्न : शाहीर साबळेंच्या कोणत्या आठवणी सांगता येतील?

भरत : शाहीर साबळे हे माझे गुरू आहेत. महाराष्ट्राची लोकधारा या लोकनृत्य कार्यक्रमात माझी कला पाहून त्यांनी मला प्रेरणा दिली. शाहीर साबळेंमुळेच १९८५ मध्ये मी खर्‍या अर्थाने रंगभूमीवर उतरलो.

प्रश्न : आगामी वाटचालीबद्दल काय सांगता येईल?

भरत : आमच्याकडे काही कथा आहेत, संकल्पना आहेत; पण फायनान्स करायला कुणी पुढे येत नाही; पण एक नक्की, की चित्रपट काढलाच तर, आम्हाला विनोदी चित्रपट काढायला आवडेल.

Web Title: The Marathi theatrical needs of all-round and every Hoonuni artists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.