महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलन अमरावतीत
By Admin | Updated: April 9, 2017 20:19 IST2017-04-09T20:19:19+5:302017-04-09T20:19:19+5:30
डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख स्मृतिपर्वाचे औचित्य साधून ११ एप्रिल रोजी अमरावती येथे आठवे राज्यस्तरीय महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलन अमरावतीत
११, १२ एप्रिलला साहित्यिक मेजवानी
अकोला : महात्मा जोतिबा फुले जयंती पर्व व शिक्षण महर्षी डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख स्मृतिपर्वाचे औचित्य साधून ११ एप्रिल रोजी अमरावती येथे आठवे राज्यस्तरीय महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात सकाळी १०.३० वाजता या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. पुरोगामी विचारवंत चंद्रकांत वानखडे हे अध्यक्ष असणार आहेत. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड. अरुण शेळके हे महात्मा फुले लिखित ‘गुलामगिरी’ गं्रथाला शृंखलामुक्त करून उद्घाटन करतील. संयोजक श्रीकृष्ण बनसोड हे भूमिका मांडतील. उद्योजक सागर खलोकार हे स्वागताध्यक्ष असतील. या संमेलनात तीन परिसंवाद, तीन एकपात्री नाट्यप्रयोग, पुस्तक प्रकाशन, सत्कार सोहळ्यासह महात्मा फुलेच्या साहित्यावर विचारमंथन होईल. प्राचार्य सुधीर महाजन, प्राचार्य स्मिता देशमुख, सत्यशोधक महादेवराव भुईभार, डॉ. गणेश खारकर, अविनाश दुधे, डॉ. रजिया सुलताना, गजेंद्र सुरकार, प्रा. सतीश जामोदकर, अर्जुन ठोसरे, चंद्रकांत देवदारे, डॉ. पुरुषोत्तम नागपुरे, प्राचार्य मधुकर आमले, डॉ. प्रवीण बनसोड, डॉ. संतोष हुसे, प्राचार्य सचिन भेलकर, प्रा. भामोदे आदी विचारवंत आपले विचार व्यक्त करतील. १२ एप्रिल रोजी सायंकाळी माया वासनिक यांच्या अध्यक्षतेखाली परिवर्तनवादी कविसंमेलनाने संमेलनाचा समारोप होईल. या संमेलनास जिल्ह्यातील साहित्यिक, विचारवंत, कलावंतांनी उपस्थित राहावे, असे आवाहन माळी महासंघाचे राजेश जावरकर यांनी केले आहे.