शहरीकरणाच्या विळख्यात अडकली जीवनदायिनी
By Admin | Updated: December 12, 2014 01:14 IST2014-12-12T01:08:01+5:302014-12-12T01:14:03+5:30
अकोल्यात मोर्णा तहानलेलीच.

शहरीकरणाच्या विळख्यात अडकली जीवनदायिनी
डॉ. किरण वाघमारे / अकोला
मोर्णा नदीचा उपयोग अकोला शहराच्या पाणीपुरवठय़ासाठी होत नसला तरी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये आजही मोर्णा ही जीवनदायिनी आहे. या गावांमध्ये ती जशी माणसांची तृष्णा भागवते, तसाच गुराढोरांसाठीदेखील मोर्णेच्या पाण्याचा वापर केला जातो. सुदैवाने या गावांमध्ये मोर्णेची स्थिती आजही बरी आहे. अकोल्यात मात्र मोर्णेची अवस्था दयनीय झालेली आहे.
मोर्णेचा उगम वाशिम जिल्ह्यातील मेडशीच्या वर मुंगळा परिसरात आहे. या ठिकाणी आजूबाजूला जंगल आहे. त्यामुळे मोर्णा जंगलातील वनस्पतींचे औषधी गुणधर्म घेऊन वाहत येते. त्यामुळे या पाण्याचे महत्त्व सर्वसाधारण नव्हे, अनन्यसाधारण आहे. मेडशी येथे मोर्णा नदीवर धरण आहे. या धरणामुळे आसपासच्या गावांतील शेतजमिनीला फायदा झाला आहे, सोबतच या गावांमधील गावकर्यांची तहानदेखील मोर्णा भागवीत आहे. मेडशीवरून पुढे पातूरच्या जंगलातून मार्गक्रमण करीत मोर्णा आष्टुल-पाष्टुल येथे येते. तिथेदेखील मोर्णा धरण बांधले गेले आहे. एक पर्यटनस्थळ म्हणूनदेखील मोर्णा प्रकल्प एक चांगली जागा आहे. पाष्टुल येथे सीतान्हाणी ही छोटी नदी मोर्णेला मिळते. पुढे मोर्णा आगीखेड, खामखेड, वरखेड, वाघजाळी, राजंदा, म्हैसपूर व चांदूर मार्गे अकोल्यात येते. या सर्वच गावांमध्ये मोर्णेच्या पाण्याचा उपयोग सिंचन आणि पिण्यासाठी केला जातो. चांदूर येथे विद्रुपा मोर्णेला येऊन मिळते. या दोन बहिणी एकत्रच पुढील प्रवास करतात.
अकोल्यातून होणारा मोर्णेचा प्रवास मात्र मोठा खडतर आहे. घाण पाणी, कचरा आणि जलकुंभी यांनी मोर्णेच्या वाटेत अडथळे निर्माण केले आहेत.
या अडथळ्यांना पार करीत पुढे निघालेली मोर्णा उगवा,आगर, पाळोदी, गोत्रा, खांबोरा, मालवाडा, हातरुण, दुधाळा मार्गे पुढे अंदुरा येथे जाते व वांगरगावनजीक पूर्णेला मिळते. या सर्वच लहान-मोठय़ा गावांसाठी मोर्णा केवळ एक नदी नाही, तर ती जीवनदायिनी आहे. अकोल्याला मोर्णेने एक ओळख दिली असली तरी अकोलेकर मोर्णेला विसरले आहेत. त्याचे परिणाम अकोलेकरांना पाणीटंचाईच्या स्वरुपात भोगावे लागत आहेत. मोर्णा केवळ अकोल्यासाठीच नाही तर अनेक गावांसाठी भाग्यविधाती होऊ शकते, हे लक्षात घेऊन मोर्णेच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी अकोलेकरांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे