कायद्याची गुंतागुंत बाल कामगारांच्या जीवावर
By Admin | Updated: June 12, 2014 20:31 IST2014-06-12T20:28:52+5:302014-06-12T20:31:22+5:30
बालकामगारांच्या वयासंदर्भात कायद्याची मोठी गुंतागुंत असल्याने बालकामगार ठेवणार्यांवर कारवाई होत नसल्याचे वास्तव समोर आले आहे.

कायद्याची गुंतागुंत बाल कामगारांच्या जीवावर
अकोला : ह्यमुले देवाघरची फुलेह्ण असे मोठय़ा कौतुकाने म्हटल्या जाते; मात्र याच बालकांचा कायद्याच्या गुंतागुंतीमुळे धोकादायक कामांसाठी मोठय़ा प्रमाणात वापर करण्यात येत आहे. बालकामगारांच्या वयासंदर्भात कायद्याची मोठी गुंतागुंत असल्याने बालकामगार ठेवणार्यांवर कारवाई होत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. कामगार आयुक्त कार्यालयाकडून मागील वर्षभरात टाकण्यात आलेल्या धाडसत्रात केवळ ८ ते ९ दुकान मालकांवर कारवाई करण्यात आली आहे.
भारताच्या राज्यघटनेनुसार १४ वर्षाआतील मुले ही बालके आहेत. या वयाच्या आतमध्ये असलेल्या मुलांना कामावर ठेवल्यास त्यांच्यावर बालकामगार कायद्यानुसार कारवाई करण्यात येते; मात्र १९९२ मध्ये भारताने आंतरराष्ट्रीय बालहक्क संहितेवर स्वाक्षरी केली असून, या संहितेमधील १९८९ च्या कलम १ अन्वये १८ वर्षाआतील मूल हे बालक आहे. एखाद्या दुकानामध्ये बालकामगार काम करीत असल्याची माहिती कामगार आयुक्तांना मिळाली आणि त्यांनी संबंधित ठिकाणावर धाड टाकल्यानंतर सदर बालकामगार १४ वर्षाच्या आत असल्यास कारवाई करण्याचे अधिकार कामगार आयुक्तांना आहेत; मात्र बालकामगार १४ वर्षाच्या वर असल्यास त्यावर कारवाई करण्यास मोठी अडचण आहे. १४ ते १६ वयोगटातील अनेक मुले बालकामगार म्हणून काम करीत आहेत; मात्र विविध कायद्यांमधील वयाच्या गुंतागुंतीमुळे बालकामगार ठेवणार्यांवर कारवाई करण्यास संबंधित यंत्रणेलाही अडचणी निर्माण होत आहेत. मागील वर्षभरामध्ये बालकामगार ठेवणार्या ठिकाणांवर धाडसत्र करण्यात आले; मात्र कारवाईचे प्रमाण अल्प असल्याचे समोर आले आहे.