...अंतिम प्रवासही सुखाचा नाही!
By Admin | Updated: May 16, 2014 21:45 IST2014-05-16T18:49:48+5:302014-05-16T21:45:25+5:30
पिंजरच्या स्मशानभूमीत जाण्यासाठी खडकाळ रस्ता

...अंतिम प्रवासही सुखाचा नाही!
पिंजर(अकोला): संपूर्ण आयुष्य धकाधकीत व्यतित केल्यानंतर चिरनिद्रा घेतलेल्यांचा अंतिम प्रवास हा स्मशानभूमीकडे सुरू होतो. पिंजर येथे मात्र मृतात्म्यांचा हा अंतिम प्रवासही सुखाचा होत नाही. कारण येथील स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्यामुळे पिंजर्डा नदीच्या काठावरील ओबडधोबड खडकांवरूनच जावे लागते. पिंजर हे बार्शीटाकळी तालुक्यातील मोठे गाव असून, या गावची लोकसंख्या जवळपास २० हजाराच्या घरात आहे. येथे पिंजर्डा नदीकाठी कारंजा रस्त्याच्या पुलाजवळ हिंदू स्मशानभूमीची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र स्मशानभूमीच्या निर्मितीपासून आजपर्यंत रस्त्याचे काम करण्यात आले नाही. त्यामुळे या मार्गावरून मृतदेह नेताना अंतिम यात्रेत सहभागी झालेल्यांना तारेवरची कसरत करावी लागते. स्मशानभूमी विकास योजनेंतर्गत पिंजर ग्रामपंचायतला १२ लाख रुपयांचा निधी प्राप्त झालेला असतानाही स्मशानभूमीपर्यंत जाणारा रस्ता मात्र अद्यापर्यंत बांधण्यात आला नाही. ग्रामपंचायत प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता बांधण्यात आला नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. दुसरा रस्ता नसल्यामुळे स्मशानभूमीकडे जाण्यासाठी अंतिम यात्रेत सहभागी झालेल्या लोकांना पिंजर्डा नदीतील खडकांवरून कसेबसे जावे लागते. पावसाळ्यात तर ही परिस्थिती आणखी भीषण होते. रस्ताच नव्हे, तर स्मशानभूमीचीही प्रचंड दुरवस्था झालेली आहे. स्मशानभूमीचे शेडही व्यवस्थित नसून, ओट्यांची पडझड झाली आहे. स्मशानभूमीत वृक्षारोपणाचीही तसदी ग्रामपंचायत प्रशासनाने घेतली नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.