जलयुक्त शिवार अभियानातून मोठी जलक्रांती शक्य
By Admin | Updated: May 22, 2015 01:44 IST2015-05-22T01:44:47+5:302015-05-22T01:44:47+5:30
जलपुरूष राजेंद्रसिंह यांचे प्रतिपादन, आकोट येथे जलसभा.

जलयुक्त शिवार अभियानातून मोठी जलक्रांती शक्य
आकोट: जल व जनशक्तीला जोडणारे हे जलयुक्त शिवार अभियान आहे. या अभियानामध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी झाल्यास मोठय़ा प्रमाणात जलक्रांती घडू शकते, असा आशावाद मॅगसेसे पुरस्कारप्राप्त जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी व्यक्त केला. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत महसूल विभागाच्यावतीने २१ मे रोजी स्थानिक श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयात सरपंच, पोलीस पाटील, जि. प., पं. स., ग्रा. पं. सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष, जलयुक्त शिवार अभियानातील कार्यकर्ते, शेतकर्यांकरिता जलसभा पार पडली. या जलसभेला मॅगसेसे पुरस्कार प्राप्त राजेंद्रसिंह यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अरुण शिंदे तर उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे, तहसीलदार प्रदीप पाटील, सचिन पाटील, डॉ. नीलेश हेडा, कृषी व जलतज्ज्ञ डॉ. सुभाष टाले, पं. स. सभापती अंजली तायडे, गटविकास अधिकारी कालीदास तापी, तालुका कृषी अधिकारी मंगेश ठाकरे, रामराजे घोडवे, केशवराव मेतकर, गजेंद्र वानखडे, हरिभाऊ वाघोडे, गोपाल कोल्हे, तेल्हाराचे मुख्याधिकारी कृष्णा निपाणे यांची उपस्थित होती. यावेळी जलशिवार योजनेंतर्गत उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी करणार्या आकोट व तेल्हारा तालुक्यातील ग्रामपंचायती तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती व प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांचा प्रशस्तिपत्र व शिल्ड देऊन सत्कार करण्यात आला. आकोट विभागातील कामाचा प्रभाव पाहून जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी एसडीओ शैलेश हिंगे तसेच जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी जलतज्ज्ञ डॉ. सुभाष टाले यांनी हा बझाडा झोन परिसर असल्याने पावसाळ्यातील ४२ टक्के पाणी समुद्रात जाऊन मिसळते. नदी, सरोवर, जमिनीतील ओलावा व नैसर्गिक ओलावा पाण्याचे स्रोत आहेत. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने घरात व शेतात जलव्यवस्थापन करावे, असे मार्गदर्शन केले. याप्रसंगी जिल्हाधिकारी शिंदे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे यांनी, शेतकर्यांनी व नागरिकांनी जलचळवळ उभी केल्यानं लोकसहभागातून मोठे काम या भागात झाले.