खारपाणपट्टय़ाला आता संशोधन केंद्राचे ‘सलाईन’!
By Admin | Updated: February 18, 2015 01:15 IST2015-02-18T01:15:48+5:302015-02-18T01:15:48+5:30
अकोल्यात होणार संशोधन केंद्र : सहा तालुक्यांच्या आशा पल्लवित.

खारपाणपट्टय़ाला आता संशोधन केंद्राचे ‘सलाईन’!
बुलडाणा : पश्चिम विदर्भातील खारपाणपट्टय़ात येणार्या ८९२ गावांना या शापातुन मुक्त करण्यासाठी आतापर्यंत विविध योजना राबविण्यात आल्या असून आता स्वतंत्र संशोधन केंद्र स्थापन होणार आहे. हे केंद्र अकोला येथे सुरू होणार असल्याने या भागातील प्रश्नांची तड लागण्याची शक्यता निर्माण झाली असुन त्यामुळे बुलडाण्यातील २५६ गावांना मोठा दिलासा मिळणार आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विदर्भातील शापित खारपाणपट्टय़ाच्या विकासासाठी स्वतंत्र संशोधन केंद्राच्या प्रस्तावावर महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन (एमसीईएआर) परिषदेने शुक्रवारी शिक्कामोर्तब केले आहे. या संशोधन केंद्रामुळे बुलडाणा जिल्ह्यातील खारपाणपट्टय़ातील लोकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. कृषी विद्यापीठात होऊ घातलेल्या या क्षारपड जमिन संशोधन केंद्रामध्ये सिंचन व पाणी या दोन प्रश्नांसह मानवी आरोग्याचाही विचार प्रामुख्याने केला जावा अशी अपेक्षा या परिसरातुन व्यक्त होत आहे. चांगली व सुपीक जमीन सुद्धा या खारपाणपटयामुळे निकृष्ट होत असल्याने सिंचनाचा प्रश्न बिकट बनला आहे. सध्या या परिसरात १४0 गाव पाणीपुरवठा योजना आकारास येत असुन ही योजना पुर्ण झाल्यावर पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न सुटणार असला तरी सिंचनासाठी ठोस अशी उपाययोजना तसेच पीक पद्धतीत बदल या दृष्टीनेही संशोधन होण्याची गरज आहे.
*किडनी आजाराच्या मृत्यूने गाठले दीड शतक
जळगाव जामोद, संग्रामपूर, शेगाव, खामगाव, नांदूरा व मलकापूर या सहा तालुक्यांना बसलेला खारपाणपट्टा विळखा हा मोठा शाप असून हा पट्टा मृत्यूचा पाश बनला आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केलेल्या सर्व्हेक्षणामध्ये गेल्या ७ वर्षात १५३ व्यक्ती किडनी विकाराने दगावल्या असल्याचे निष्पन्न झाले असून सद्यस्थितीत ५00 च्या वर रूग्ण किडनी स्टोनने आजारी असल्याचे समोर आले आहे.
*खारपाण पट्ट्यातील पाणी दूषित असून ते पिण्याने किडणीचे आजार व कर्करोगासारखे दुर्धर आजार होतात.या परिसरात किडणी तसेच पोटाचे विकार वाढले आहेत. वर्षानुवर्षे त्याचे दुष्परिणाम या भागातील जनता सहन करीत आहे. *या खारपाणपट्टय़ातील माती चोपण असून, पिण्याचे पाणी खारे आहे. या पाण्यात अनेक प्रकारचे क्षार असल्याने कृषिमाल उत्पादनावर त्याचा परिणाम तर होतो. *खारपाण पट्ट्यातील पाण्याचे डॉ. हिम्मतराव बावस्कार यांनी नमुने घेतले होते.या चाचणीत पाण्यात शरीरास घातक कॅडमियन, पी.पी एम आर्सनिक व कॉपर निल सारखी रासायनिक घटक आढळून आले होते.