जोशी हत्याकांडातील आरोपीं न्यायालयात शरण
By Admin | Updated: July 17, 2014 01:44 IST2014-07-17T01:37:31+5:302014-07-17T01:44:28+5:30
अकोल्यातील कार्तिक जोशी हत्या प्रकरण; आरोपीं अखेर न्यायालयासमोर शरण.

जोशी हत्याकांडातील आरोपीं न्यायालयात शरण
अकोला: रामनगरातील युवा सेनेचा कार्यकर्ता कार्तिक जोशी याच्या हत्या प्रकरणातील ८ ते १0 आरोपी अखेर बुधवारी न्यायाधीश एस.जी. सावदेकर यांच्या न्यायालयासमोर शरण आले. पोलिसांनी आरोपींना अटक करून त्यांची कारागृहात रवानगी केली.
आरोपींचा जामीन रद्द करण्यासाठी संदीप जोशी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे अर्ज केला होता. या प्रकरणी न्यायाधीश तहलियानी यांच्या न्यायालयाने जिल्हा न्यायालयाने आरोपींना दिलेला जामीन रद्द ठरविला. विशेष म्हणजे हत्याकांडातील १३ आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. कार्तिक जोशी हत्याकांडातील आरोपी मनसेचे नगरसेवक राजेश काळे, बजरंग नागे, राहुल ठाकूर, संजू चव्हाण, विकी पटोने, अंकुश गमे, शेखर शर्मा, नितीन चाळसे, सुलतान पटोने, संदीप चरण खोडे, सागर घनबहादूर, राकेश खोडे या १३ आरोपींना जुने शहर पोलिसांनी अटक केली होती. नंतर आरोपींची कारागृहात रवानगी करण्यात आली होती. आरोपींनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. जिल्हा व सत्र न्यायालयाने १३ आरोपींना जामीन मंजूर करून त्यांची सुटका केली; परंतु तक्रारकर्ते संदीप मदनलाल जोशी यांनी या प्रकरणी नागपूर उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांनी आरोपींचा जामीन रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली. न्यायाधीश तहलियानी यांनी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपींना दिलेला जामीन रद्द ठरविला आणि आरोपींनी न्यायालयाला शरण येण्याचे आदेश दिले. मात्र, त्यानंतर आरोपींनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला; परंतु या ठिकाणीही त्यांच्या पदरी निराशा आली.