जामोद दंगल : ८७ जणांना अटक
By Admin | Updated: April 18, 2016 02:26 IST2016-04-18T02:26:03+5:302016-04-18T02:26:03+5:30
दुस-या दिवशीही संचारबंदी; परिस्थिती नियंत्रणात

जामोद दंगल : ८७ जणांना अटक
जळगाव जामोद (जि. बुलडाणा) : जामोद येथील दंगलप्रकरणी पोलिसांनी अटकसत्र सुरू केले असून, ८७ जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, रात्रीपासून लागू करण्यात आलेली संचारबंदी रविवारी दुसर्या दिवशीही कायम होती. संचारबंदीमुळे गावातील एक लग्नसोहळा पुढे ढकलण्यात आला असून, गावात तणावपूर्ण शांतता आहे.
श्रीराम नवमीनिमित्त आयोजित महाप्रसादासाठी १६ एप्रिल रोजी रात्री ८ वाजताच्या दरम्यान भाकरी घेऊन ट्रॅक्टर जात होता. ट्रॅक्टर जात असलेल्या मार्गावरील रहिवासी मुक्कदरखा इसाखा यांच्या आईचे निधन झाल्यामुळे तेथे घोषणा देऊ नये, असे सांगण्यात आले. परंतु घोषणा सुरूच राहिल्याने तेथे बाचाबाची होऊन तणाव वाढला. यानंतर दगडफेक व जाळपोळीचे प्रकार घडले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला होता. १६ एप्रिल रोजी रात्री उशिरा परिस्थितीवर नियंत्रण मिळविल्यानंतर गावात संचारबंदी लागू करण्यात आली. दरम्यान, १७ एप्रिल रोजी दिवसभर संचारबंदी कायम होती. १६ एप्रिल रोजी रात्री जमावाकडून चार दुकाने, दोन मोटारसायकली, दोन चारचाकी वाहने, दोन पानठेल्यांची जाळपोळ तसेच तीन ते चार दुकानांची तोडफोड करण्यात आली. तसेच दोन चारचाकी वाहनांची नासधूस केली. तीन वाहनांना जाळण्याचा प्रयत्न झाला. तसेच दोन्ही समाजाच्या प्रार्थनास्थळांना हानी पोहोचवण्याचा प्रयत्न झाला होता. यावेळी झालेल्या दगडफेकीत उपविभागीय पोलीस अधिकारी सोळंके, पोकाँ सुभाष वाघमारे, भूषण सोळंके, गजानन नरुटे, कैलास पंडित व दीपक सपकाळ जखमी झाले. जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार बावीस्कर, अपर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे व निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र टापरे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. १६ एप्रिल रोजी रात्रीपासूनच पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणी पोलीस स्टेशन जळगाव जामोद येथे १११ आरोपींविरुद्ध गुन्हा र.नं. १५४/२0१६ कलम १४३, १४७, १४८, १४९, ३९५, ३५३, ३0७, ३२४, ३३२, ४३५, ४३६, २९५, १८६ भादंविनुसार तसेच ३/२५, ४/२५, ७ (अ), २७ भारतीय शस्त्र अधिनियम कलम ७ क्रिमिनल अमेडमेंट अँक्ट, कलम ३ व ४ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायद्यानुसार दाखल करून एकूण ८७ आरोपींना अटक करण्यात आली आहे.