प्लास्टिकच्या अतिवापरामुळे प्रदूषणात वाढ
By Admin | Updated: May 29, 2014 23:24 IST2014-05-29T19:54:57+5:302014-05-29T23:24:59+5:30
प्लास्टिक कोटेड पत्रावळी आणि प्लास्टिकचे ग्लासचा अत्याधिक वापर होत आहे.

प्लास्टिकच्या अतिवापरामुळे प्रदूषणात वाढ
पातूर : लग्नकार्यासाठी लागणार्या वस्तूची विल्हेवाट लागत नसल्यामुळे प्रदूषणात वाढ झाल्याचे दिसत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी प्लास्टिकचे ग्लास सर्रास वापरण्यात येतात; परंतु हजारोच्या संख्येंनी असलेले हे ग्लास रस्त्यावर फेकून देण्यात येत असल्यामुळे प्रदूषण वाढीस हातभार लागत आहे. लग्न सराईत ग्रामीण भागात एकाच दिवसी अनेक लग्न सोहळे असतात. या लग्न सोहळ्यात जेवणासाठी प्लास्टिक कोटेड पत्रावळी आणि पाणी पिण्याकरिता डिस्पोजलचा अत्याधिक वापर होत आहे. जेवणाची पंगत उठल्यानंतर या पत्रावळी आणि डिस्पोजल परिसरात अस्ताव्यस्त टाकण्यात येत असतात. त्यावर उष्टे अन्नही असते. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरते. मंगल कार्यालयाच्या बाहेर या पत्रावळी, द्रोण, डिस्पोजल वाट्या फेकून दिलेल्या असतात. मात्र मंगल कार्यालयाचे संचालक किंवा वर-वधूकडील मंडळी या पत्रावळी, डिस्पोजलची विल्हेवाट लावण्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे दुगंर्धी निर्माण होते. पूर्वीच्या काळात पळस अथवा मोहाच्या पानाच्या पत्रावळी सर्वत्र राहत होत्या. आता त्याची जागा प्लास्टिकपासून निर्मित पत्रावळींनी घेतली आहे. या पत्रावळी प्लास्टिकच्या असल्याने जमिनीत गाडल्या तरी कुजत नाहीत. त्यामुळे पर्यावरणालाही धोका निर्माण होत असतो. यासाठी प्लास्टिक पत्रावळी, डिस्पोजलची योग्य विल्हेवाट लावणे अत्यंत गरजेचे झाले आहे. या कामासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने यंत्रणा राबवावी, अशी मागणी होत आहे.