बाश्रीटाकळीतील अवैध जल वाहिन्यांवर हातोडा
By Admin | Updated: January 17, 2015 01:29 IST2015-01-17T01:29:33+5:302015-01-17T01:29:33+5:30
अकोला महापालिकेची आज कारवाई; पोलिसांची घेणार मदत.

बाश्रीटाकळीतील अवैध जल वाहिन्यांवर हातोडा
अकोला : शहराला पाणीपुरवठा करणार्या मुख्य जलवाहिनीवरून पाण्याची चोरी रोखण्यासाठी महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. बाश्रीटाकळी येथील अवैध जलवाहिन्यांचे कनेक्शन तोडण्यासाठी मनपा उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी मनपाचा मोठा ताफा ग्रामपंचायतच्या हद्दीत धडकणार असून, याकरिता स्थानिक पोलिसांची मदत घेतली जाईल. मनपाच्या इतिहासात अशी कारवाई पहिल्यांदाच होणार असल्याने याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
महान धरणातून अकोलेकरांना पाणीपुरवठा केला जातो. महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावर ६५ एमएलडी व २५ एमएलडीचे प्लान्ट आहेत. यापैकी २५ एमएलडी प्लान्टमधून पाणीपुरवठा करणार्या मुख्य जलवाहिनीद्वारे बाश्रीटाकळी ग्रामपंचायतला पाणीपुरवठा केला जातो. त्यानंतर अकोला शहराला पाणीपुरवठा होतो. याबदल्यात बाश्रीटाकळी ग्रामपंचायतकडून रीतसर पाणीपट्टी वसूल केली जाते. यादरम्यान ग्रामपंचायत हद्दीतील जलकुंभापर्यंत पाणी पोहोचत नसल्याने नागरिकांनी चक्क मुख्य जलवाहिनीला ठिकठिकाणी फोडून पाण्याची पळवापळवी सुरू केली आहे. बाश्रीटाकळी गावात तब्बल २४ ठिकाणी जलवाहिनीवर ह्यटॅपिंगह्ण करून पाण्याची चोरी केली जात आहे. ह्यटॅपिंगह्णवरून एकाच वेळी अनेक नागरिकांना पाणीपुरवठा होण्यासाठी नळांचे स्टॅन्ड तयार करण्यात आले आहेत. असे स्टॅन्ड गावात ठिकठिकाणी दिसून येतात. अकोला शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी जास्त अवधी लागत असल्याचा गैरफायदा घेत, गावामध्ये मनपाच्या पाण्याचा फुकटात दिवसभर वापर सुरू असतो. पाणीपट्टी थकीत ठेवण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. याचा परिणाम अकोला शहराला होणार्या पाणीपुरवठा योजनेवर होत आहे. या सर्व बाबी लक्षात घेता, पाण्याच्या पळवापळवीला चाप लावण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. मनपातील जलप्रदाय विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता सुनील काळे यांनी मुख्य जलवाहिनीवरून पाण्याची चोरी होत असल्याची तक्रार बाश्रीटाकळी पोलीस ठाण्यात केली होती. १७ जानेवारी रोजी मनपाचा संपूर्ण ताफा बाश्रीटाकळी ग्रामपंचायतच्या हद्दीत अवैध नळ कनेक्शन तोडण्यासाठी रवाना होणार आहे. कारवाईसाठी मनपाची यंत्रणा सज्ज झाली असून, सुरक्षा रक्षक, जेसीबी, ट्रकसह वरिष्ठ अधिकारी कारवाईत सहभागी होतील. बंदोबस्तासाठी स्थानिक पोलिसांची मदत घेण्यात येत आहे.
बाश्रीटाकळी ग्रामपंचायत क्षेत्रात मनपाच्या मुख्य जलवाहिनीवरून पाण्याची खुलेआम चोरी होत आहे. यासंदर्भात आम्ही जिल्हा परिषद प्रशासनासह ग्रामपंचायतीला सतत पत्रव्यवहार करून अवगत केले आहे. शिवाय कोट्यवधी रुपयांची पाणीपट्टी थकीत आहे. एकूणच अवैध नळ कनेक्शन तोडण्याची नितांत आवश्यकता आहे. शनिवारी कारवाईला सुरुवात केली जाणार असल्याचे प्रभारी कार्यकारी अभियंता सुनील काळे यांनी स्पष्ट केले.
*२ कोटी ८0 लाखांची पाणीपट्टी थकीत
बाश्रीटाकळी ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना मनपाकडून पाणीपुरवठा केला जातो. याबदल्यात ग्रामपंचायतीकडून रीतसर पाणीपट्टी जमा करणे भाग असताना तब्बल २ कोटी ८0 लाखांची पाणीपट्टी थकीत असल्याची माहिती आहे. मलकापूर ग्रामपंचायतकडेदेखील कोट्यवधीची पाणीपट्टी थकीत असून, याकडे मनपाचे दुर्लक्ष होत आहे.