समूहशेतीने युवकांना गवसली दिशा!
By Admin | Updated: January 16, 2016 02:10 IST2016-01-16T02:10:08+5:302016-01-16T02:10:08+5:30
८0 एकरांत घेतले गव्हाचे विक्रमी उत्पादन, ‘गणेश ब्रॅण्ड’ नावाने दिली गव्हाला ओळख.

समूहशेतीने युवकांना गवसली दिशा!
नितीन गव्हाळे, अकोला: सततची नापिकी, दुष्काळसदृश परिस्थिती, निसर्गाचा लहरीपणा, सिंचनाची सुविधा नाही; अशा बिकट परिस्थितीत आकोट तालुक्यातील सुकळी गावातील युवा शेतकर्यांनी एकत्र येऊन आदर्श स्वयंसाहाय्यता शेतकरी गटाची स्थापना केली आणि समूहशेती करण्यावर भर दिला आणि कमी खर्चात जास्त उत्पादन घेऊन यशाचा श्रीगणेशा केला. ८0 एकरांमध्ये तब्बल ९00 क्विंटल गव्हाचे उत्पादन घेऊन त्याची बाजारपेठेत विक्री न करता, थेट ग्राहकांपर्यंंत ह्यगणेश ब्रॅण्डह्ण नावाने विक्री करून बक्कळ नफासुद्धा कमावला. सुकळी हे सातपुड्याच्या पायथ्याशी असणारं गाव. पोपटखेड प्रकल्प जवळ असला तरी गावात सिंचनाची सोय नाही. विहिरी आणि बोअरवेल आहेत; पण त्यातीलही पाण्याची पातळी खोल गेलेली. शेतकरी म्हटला की, संघर्ष पाचवीला पुजलेलाच. नापिकी, दुष्काळ, कर्जबाजारीपणा ही नेहमीचीच संकटं; परंतु यातून मार्ग काढण्यासाठी गावातील १९ युवकांनी २0१२ मध्ये एकत्र येऊन तुकड्या-तुकड्यांमध्ये विभागलेल्या शेतीला समूहशेतीचे व्यापक स्वरूप दिले. कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्यावर युवकांनी भर दिला. त्यासाठी आत्मा व कृषी विभागाची मदत घेतली. पहिल्याच वर्षी युवकांनी शरबती व सागर-वन या वाणांची लागवड करून एकरी १२ ते १४ क्विंटल सरासरीने गव्हाचे विक्रमी ९00 क्विंटल उत्पादन घेतले. गव्हाला बाजारपेठेत योग्य भाव मिळणार नाही, ही बाब हेरून युवकांनी थेट ग्राहकांपर्यंत पोहोचून गव्हाची विक्री करण्याचे ठरविले. आकोटमधील खासगी आस्थापनाद्वारे गव्हाची योग्य प्रतवारी व प्रक्रिया करून, आकर्षक पॅकिंग करून विक्री सेवा केंद्र सुरू केले. ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. युवकांना आत्माचे प्रकल्प संचालक अशोक बाणखेले, प्रकल्प उपसंचालक कुरबान तडवी, कृषी पणन तज्ज्ञ नरेंद्र पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले.
१00 एकरांसाठी बियाणे, खते मिळाली
मोफत आदर्श स्वयंसाहाय्यता शेतकरी गट असल्यामुळे पीक उत्पादनासाठी होणार्या खर्चातून शेतकर्यांना सूट मिळाली आणि समूहशेतीमुळे यांत्रिकीकरणापासून तर मशागतीपर्यंंत खर्चातून व होणार्या त्रासातून मुक्तता झाली. कृषी विभागाच्या महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषिविकास प्रकल्पांतर्गत १00 एकरांचे बियाणे, सूक्ष्म अन्नद्रव्ये, तणनाशके, बुरशीनाशके, संजीवके आदी मोफत मिळाले.