शेतकर्यांना १२ कोटींचे अनुदान
By Admin | Updated: May 28, 2014 21:53 IST2014-05-28T21:49:39+5:302014-05-28T21:53:20+5:30
वादळी वार्यासह झालेली गारपीट आणि अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या १३ हजार ६६४ शेतकर्यांना नुकसानीचे अनुदान देण्यासाठी १२ कोटी ४९ लाख रुपये प्राप्त झाले आहेत.

शेतकर्यांना १२ कोटींचे अनुदान
मूर्तिजापूर: यंदा फेबु्रवारी आणि मार्च महिन्यात वादळी वार्यासह झालेली गारपीट आणि अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या १३ हजार ६६४ शेतकर्यांना नुकसानीचे अनुदान देण्यासाठी १२ कोटी ४९ लाख रुपये प्राप्त झाले आहेत.
गेल्या खरीप हंगामात पिकांवर सतत नाराज असलेला निसर्ग रब्बी हंगामात अधिकच आक्र मक झाला आणि वादळी वार्यासह गारपीट, तसेच अवकाळी पावसामुळे तालुक्यातील ३ हजार ६४० हेक्टरवरील शेतीक्षेत्र बाधित झाले. या नैसर्गिक आपत्तीमुळे गहू, हरभरा या पिकांसह फळबागांचेही मोठे नुकसान होऊन शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला; परंतु अल्पसा का होईना शासनाने मदतीचा हात समोर केला असून, नुकसानग्रस्त शेतकर्यांना अनुदान देण्यासाठी तालुक्यात १२ कोटी ४९ लाख रुपयांचा निधी आला आहे. प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या खात्यात २१ मे रोजी त्यांच्या वाट्याचे अनुदान जमा केले आहे. ज्या शेतकर्यांच्या खाते क्रमांकात चुका असतील, त्या दुरुस्तीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. ज्या शेतकर्यांचे खाते क्रमांक बरोबर आहेत त्यांच्या खात्यात अनुदान जमा होणार आहे.
तालुक्यातील १० हजार ९९९ शेतकरी हे अकोला अर्बन बँकेचे खातेदार असून, त्यांच्या खात्यावर सरळ अनुदान जमा करण्यात आले आहे. लोकसभा आचारसंहितेमुळे अनुदान मिळण्यास विलंब झाला असला तरी, शेतकर्यांना नेमके खरीप हंगामाच्या मशागतीसाठी अनुदान मिळत असल्यामुळे शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. बँकांनी आढेवेढे न घेता हे अनुदान त्वरित वितरित करावे, अशी मागणीसुद्धा शेतकर्यांकडून करण्यात येत आहे.