शेतकरी आत्महत्या, दुष्काळाच्या मुद्यावर सरकार संवेदनाहीन

By Admin | Updated: August 27, 2015 00:55 IST2015-08-27T00:55:41+5:302015-08-27T00:55:41+5:30

सरकार निव्वळ घोषणाबाज असल्याचा प्रकाश आंबेडकर यांचा पत्रकार परिषदेत आरोप.

The government is uncompromising on the issue of farmers' suicides and drought | शेतकरी आत्महत्या, दुष्काळाच्या मुद्यावर सरकार संवेदनाहीन

शेतकरी आत्महत्या, दुष्काळाच्या मुद्यावर सरकार संवेदनाहीन

अकोला: राज्यातील सध्याचे सरकार निव्वळ घोषणाबाज सरकार असल्याचे सांगत, शेतकरी आत्महत्या आणि दुष्काळाच्या मुद्यावर राज्य सरकार संवेदनाहीन आहे, असा आरोप भारिप-बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा अँड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी येथे केला. अकोल्यातील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यातील सध्याचे सरकार निव्वळ घोषणाबाज सरकार असून, नवीन काहीच या सरकारकडून करण्यात आले नाही. अत्यल्प पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत राज्यात शेतकरी आत्महत्यांच्या घटना वाढत आहेत; मात्र शेतकर्‍यांचे प्रश्न आणि दुष्काळी परिस्थितीच्या मुद्यावर राज्य सरकार दिशाहीन असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यातील दुष्काळी परिस्थिती व शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर महाराष्ट्र लोकशाही आघाडी आणि डावी लोकशाही आघाडीच्यावतीने आंदोलन छेडले जाणार आहे. त्यामध्ये २ सप्टेंबर रोजी सर्व डाव्या संघटना आणि कामगार संघटनांच्यावतीने संप पुकारण्यात आला आहे. तसेच येत्या हंगामात पेरणीसाठी शेतकर्‍यांना मोफत बियाणे पुरविणे, खताला सबसिडी, पिण्याच्या पाण्याचे नियोजन, दुष्काळी भागात जनावरांसाठी छावण्या उभारणे, शेतीमालाची खरेदी कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत करण्यात यावी, इत्यादी मुद्यांवर महाराष्ट्र लोकशाही आघाडी आणि डावी लोकशाही आघाडी आंदोलन करणार असल्याचे अँड. आंबेडकर यांनी सांगितले. राज्यातील भाजपचे सरकार निव्वळ घोषणाबाज सरकार असल्याची टीका करीत, राज्यात सरकारला आर्थिक आणीबाणी आणायची आहे, तसाच जाणीवपूर्वक सरकारचा सध्या कारभार सुरू असून, आर्थिक आणीबाणी लावल्याशिवाय पर्याय नाही, असा पर्याय ठेवण्याची तयारी सरकारकडून सुरू आहे. त्यामुळे सरकारची लोकशाहीसोबत बांधीलकी आहे की नाही, याबाबत शंका आहे, असा आरोप अँड. आंबेडकर यांनी केला. या पत्रकार परिषदेला जिल्हा परिषद अध्यक्ष शरद गवई, भारिप-बमसंचे जिल्हा कार्याध्यक्ष काशीराम साबळे, कृषी सभापती रामदास मालवे, बालमुकुंद भिरड, जिल्हा सरचिटणीस अश्‍वजित शिरसाट, मनपा गटनेता गजानन गवई, जिल्हा परिषद सदस्य विजय लव्हाळे, बळीराम चिकटे, डॉ.प्रसन्नजित गवई, शेख साबीर उपस्थित होते.

Web Title: The government is uncompromising on the issue of farmers' suicides and drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.