शेतक-यांना संपविण्याचे सरकारचे षडयंत्र!
By Admin | Updated: February 5, 2016 02:22 IST2016-02-05T02:22:06+5:302016-02-05T02:22:06+5:30
मोताळ्यात युवक काँग्रेसचा एल्गार मोर्चा; युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अमरिंदरसिंग ब्रार यांचा आरोप.

शेतक-यांना संपविण्याचे सरकारचे षडयंत्र!
बुलडाणा : केंद्र व राज्यातील भाजपा सरकार हे शेतकरीविरोधी आहे. उद्योगपती आणि व्यापार्यांच्या सोयीचे निर्णय घेताना, या सरकारकडे पैसा असतो; मात्र शेतकर्यांना कर्जमाफी, कापसाचे अनुदान, दुष्काळी मदत देताना पैसा नसतो. या सरकारचे उद्दिष्ट शेतकर्याला संपविण्याचे असून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मानसिकतेतून हे षडयंत्र रचले जात आहे, असा आरोप अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष आ. अमरिंदरसिंग राजा ब्रार यांनी केला. मोताळा येथे युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित एल्गार मोर्चात अमरिंदरसिंग बोलत होते. मंचावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे, आ. राहुल बोंद्रे, आ. हर्षवर्धन सपकाळ, आ. अमित झनक, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, युवक काँग्रेसचे प्रभारी हिंमतसिंह, अ.भा. युवक काँग्रेसचे सचिव हरेकृष्णा, महिला काँग्रेसच्या सरचिटणीस जयश्री शेळके, ज्येष्ठ नेते मुख्त्यारसिंह राजपूत, बुलडाणा लोकसभा युवक काँग्रेस अध्यक्ष मनोज कायंदे आदी उपस्थित होते. अमरिंदरसिंग राजा ब्रार यांनी मोदी सरकारच्या घोषणांची खिल्ली उडवत शेतकर्यांच्या प्रश्नांना हात घातला. केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार हे शेतकरीविरोधी आहे. त्यांनी कांदा, भात अशा पिकांवर निर्यातमूल्य वाढविले, भूमी अधिग्रहणसारखा कायदा आणण्याचा प्रयत्न केला; मात्र काँग्रेसने हा प्रकार हाणून पाडण्यासाठी आता रस्त्यावर उतरून संघर्षाची तयारी ठेवली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सक्रिय झाला असून, सरकारच्या ध्येय-धोरणांवर त्याचा प्रभाव दिसतो. त्यामुळेच संघाच्या इशार्यावर केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी हैदराबादमधील रोहित वेमुला या दलित विद्यार्थ्याला विद्यापीठाच्या बाहेर काढले. त्यामुळेच रोहितने आत्महत्या केली. रोहितच्या बलिदानाला युवक काँग्रेस वाया जाऊ देणार नाही. सामान्यांची वेदना या सरकारला समजत नाही. केवळ जनतेला मूर्ख बनविण्याचे काम हे सरकार करीत असून, येत्या काळात राज्यातील ३५ जिल्ह्यांमध्ये अशा स्वरूपाचे एल्गार मोर्चे काढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.