सिंचन प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी प्रसंगी कर्जरोखे उभारू!
By Admin | Updated: May 7, 2016 01:19 IST2016-05-07T01:19:18+5:302016-05-07T01:19:18+5:30
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही : जिगाव प्रकल्पाची पाहणी.

सिंचन प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी प्रसंगी कर्जरोखे उभारू!
बुलडाणा: राज्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी शासनस्तरावर सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. सर्व प्रकल्पांसाठी जवळपास एक लाख कोटी रुपयांच्या निधीची गरज असून, हा निधी उभारण्यासाठी वेळ पडली तर केंद्र सरकारच्या मदतीने कर्ज रोखे उभारले जातील; मात्र सर्व प्रकल्प हे पूर्ण केले जातील, अशी ग्वाही जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात असलेल्या जिगाव या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाची पाहणी करण्याकरिता जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन हे जिगाव प्रकल्पस्थळी शुक्रवारी आले होते. गेल्या दहा वर्षात प्रत्यक्ष प्रकल्पस्थळाला भेट देणारे महाजन हे पहिलेच मंत्री ठरले आहेत. प्रकल्पस्थळावर शेतकरी व प्रकल्पग्रस्तांशी संवाद साधताना महाजन यांनी, तीन वर्षात जिगाव प्रकल्प पूर्ण केला जाईल, त्यासाठी ४ हजार कोटी रुपयांचा निधी उभारला जाईल, अशी ग्वाही दिली. यावेळी शेतकर्यांनी पुनर्वसनाबाबत महाजन यांना काही प्रश्न विचारले.