कोमेजलेल्या पिकांना घोटभर पाण्याचा आधार!
By Admin | Updated: August 17, 2014 01:50 IST2014-08-17T01:45:19+5:302014-08-17T01:50:42+5:30
पावसाने प्रदीर्घ दडी मारल्याने पश्चिम विदर्भातील शेतकर्यांचे हरित स्वप्न करपू लागली आहेत.

कोमेजलेल्या पिकांना घोटभर पाण्याचा आधार!
अकोला : पावसाने प्रदीर्घ दडी मारल्याने पश्चिम विदर्भातील शेतकर्यांचे हरित स्वप्न करपू लागली असून, माना टाकणार्या पिकांना जगविण्यासाठी शेतकर्यांना डब्याने पाणी देण्याची वेळ आली आहे.
यावर्षी दीड महिना उशिरा पाऊस सुरू झाल्याने पेरण्याही विलंबाने झाल्यात. त्यामुळे अगोदरच पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामध्ये सलग तीन आठवड्यापासून पावसाने दडी मारली असून, तापमान वाढल्याने पिके कोमेजू लागली आहेत.
जिल्ह्यातील खरीप पिकाचे क्षेत्रफळ ४ लाख ८३ हजार ८८0 हेक्टर असून, आतापर्यंंत ४ लाख २0 हजार ६३८ हेक्टर म्हणजेच ८७ टक्के क्षेत्रावर शेतकर्यांनी पेरणी झाली असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. यात सर्वाधिक २ लाख २२ हजार ७00 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी शेतकर्यांनी केली आहे. त्यानंतर कापूस १ लाख १४ हजार १८९ हेक्टर, तूर ४५ हजार ८५३ , मूग १७ हजार, उडीद ८ हजार २५७, ज्वारी १0 हजार ७00, बाजरी ४0 हेक्टर, मका १0५, इतर तृणधान्य ३६ हेक्टर, इतर कडधान्य १३ हेक्टर, ऊस ५९ हेक्टर तर ज्यूट २८0 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
यावर्षी शेतकर्यांनी सोयाबीन पेरणीवर भर दिला आहे. या पिकाला पाण्याची भरपूर व नितांत गरज असते. एकतर दीड महिना उशिरा पाऊस आल्याने दीड महिना उशिरा पेरणी करावी लागली. पेरणी झाल्यांनतरही पाऊस नसल्याने शेतकर्यांचे तोंडचे पाणी पळाले असून, शेतकरी सैरभैर झाला आहे. पावसामुळे बहुतांश ठिकाणी पिके उलटली आहेत. तर काही शेकडो हेक्टरवरील सोयाबीन बियाणे उगवले नसल्याने शेतकर्यांना कर्ज काढून दुबार, तिबार पेरणी करावी लागली. त्यामुळे शेतकरी अगोदरच प्रचंड आर्थिक संकटात सापडलेला आहे. त्यामुळे पीक जगले पाहिजे म्हणून शेतकरी लोट्याने पाणी देऊन पीके जगविण्याचे प्रयत्न करीत आहेत.
*पिकांची वाढ खुंटली
पाऊस नसल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. ज्यांच्याकडे संरक्षित सिंचनाची सोय आहे. त्यांना पाण्याचा काटेकोर वापर करावा लागत आहे. ज्यांच्याकडे कोणतीच सोय नाही त्यांना पिके जगविण्यासाठीची कसरत करावी लागत आहे.
*कीटकनाशकांचा खर्च वाढला
पकावर कीड, रोगराई वाढल्याने शेतकर्यांचा कीटकनाशके, खताचा खर्च अतिरिक्त करावा लागत आहे. त्यामुळे शेतकर्यावर आर्थिक बोजा वाढत असून, शेतकर्यांना विविध ठिकाणाहून कर्ज काढावे लागत आहे.
*पावसाची नितांत गरज
येत्या दोन-तीन दिवसांत पाऊस न आल्यास पिके जळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रखर तापमानामुळे जमिनीला भेगा पडल्याने पिकांना जमिनीतील ओलाव्याचा आधार संपला आहे. त्यामुळे आता पाणीच हवे आहे.