अकोलेकरांच्या वाट्याला पाच नवीन गाड्या
By Admin | Updated: July 11, 2014 00:34 IST2014-07-11T00:34:04+5:302014-07-11T00:34:04+5:30
नव्याने सुरू करण्यात येणार्या गाड्यांपैकी ५ गाड्या अकोलेकरांच्या वाट्याला येणार आहेत;

अकोलेकरांच्या वाट्याला पाच नवीन गाड्या
अकोला : नव्यानेच सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने आपला पहिला रेल्वे अर्थसंकल्प मंगळवारी संसदेत सादर केला. हायटेक बाबींचा अंतर्भाव असलेल्या या अर्थसंकल्पात भुसावळ-वर्धादरम्यान तिसरा ट्रॅक (रेल्वे मार्ग) निर्माण करण्याची घोषणा करण्यात आली. नव्याने सुरू करण्यात येणार्या गाड्यांपैकी ५ गाड्या अकोलेकरांच्या वाट्याला येणार आहेत; मात्र स्थानिक खासदारांनी केंद्रात रेटून धरलेली अकोला-खंडवा गेजपरिवर्तनाची मागणी मान्य न झाल्याने अकोलेकरांचा भ्रमनिरास झाला आहे.
नव्याने सुरू करण्यात येणार्या गाड्यांमध्ये २७ नवीन, ५ प्रिमियम, ५ जनसाधारण, ८ पॅसेंजर, २ एमईएमयू, ५ डीईएमयू, ६ संपूर्ण वातानुकूलित आणि ११ गाड्यांचा विस्तार करण्यात येणार आहे. लवकरच नव्याने सुरू होणार्या गाड्यापैकी नागपूर-पुणे, नागपूर-मुंबई (संपूर्ण वातानुकूलित), मुंबई-काजीपेठ, हापा-बिलासपूर आणि नांदेड-बिकानेर या पाच गाड्या अकोलेकरांच्या वाट्याला येणार आहेत. या मार्गावर गाड्यांचे आवागमन वाढले असल्याने भुसावळ ते वर्धादरम्यान आणखी एक तिसरा रेल्वे मार्ग निर्माण करण्याची घोषणा करण्यात आली आहे. अकोला-खंडवा, खामगाव-जालना, अचलपूर-मूर्तिजापूर-यवतमाळ, वर्धा-यवतमाळ-नांदेड, वाशिम-आदिलाबाद या सर्व प्रकल्पांशी अकोलेकरांचा जवळचा संबंध आहे. त्यामुळे या प्रकल्पांना यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात हिरवी झेंडी मिळेल अशी आशा वैदर्भीयांना होती.
स्थानिक खासदारांनी अकोला-खंडवा रेल्वे मार्गाच्या गेजपरिवर्तनाचा मुद्दा केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे रेटूनदेखील धरला होता; मात्र मंगळवारी सादर करण्यात आलेल्या रेल्वे अर्थसंकल्पात कुठलाच प्रकल्पाबाबत घोषणा न झाल्याने अकोलेकरांचा भ्रमनिरास झाला आहे.