गळफास घेऊन शेतक-याची आत्महत्या
By Admin | Updated: August 27, 2015 23:45 IST2015-08-27T23:45:23+5:302015-08-27T23:45:23+5:30
लोणार तालुक्यातील घटना.

गळफास घेऊन शेतक-याची आत्महत्या
लोणार (जि. बुलडाणा) : सततची नापिकी आणि पावसाअभावी फसलेल्या दुबार पेरणीमुळे हताश झालेल्या शेतकर्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील हत्ता येथे २६ ऑगस्टच्या मध्यरात्री घडली. गत चार महिन्यांत तालुक्यातील १0 शेतकर्यांनी त्याची जीवनयात्रा संपवली आहे. हत्ता येथील दिनकर काशिराम पवार (४५) या शेतकर्याजवळ ४ एकर शेती असून, सन २0११ साली स्टेट बँकेच्या लोणार शाखेकडून ५0 हजार रुपयाचे पीककर्ज काढले होते. कधी गारपीट, कधी अतवृष्टी तर कधी दुष्काळ यामुळे गेल्या तीन वर्षांपासून शेती उत्पन्नावर मोठय़ा प्रमाणावर परिणाम झाला. काहीच न पिकल्यामुळे दिनकर पवार बँकेचे पीककर्ज भरु शकले नाहीत, यामुळे यंदा बँकेने पीककर्जाचे पुनर्गठन केले नाही. उसनवारीने पैसे काढून मृग नक्षत्रावर केलेली पेरणी पाण्याअभावी फसल्यानंतर १५ दिवसांपूर्वी पडलेल्या संततधार पावसाने मोठी ओढ दिल्याने दुबार पेरणी फसल्याचे दिसताच हताश झालेल्या दिनकर पवार यांनी सततच्या नापिकीला कंटाळून शेतातील झाडाला गळफास लावून जीवनयात्रा संपविली. दिनकर पवार यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा आप्त परिवार आहे. दिनकर पवार यांनी दोन वर्षांपूर्वी मोठय़ा मुलीचे लग्न केले होते, तर दुसर्या मुलीच्या लग्नाची चिंताही त्यांना होती.