शेतक-यांनी हरितगृह शेती विकासावर भर द्यावा
By Admin | Updated: September 2, 2015 02:18 IST2015-09-02T02:18:12+5:302015-09-02T02:18:12+5:30
केंद्रीय कृषी मंत्रालयाचे अतिरिक्त आयुक्त काळे यांचे प्रतिपादन.

शेतक-यांनी हरितगृह शेती विकासावर भर द्यावा
अकोला : आता पर्जन्यमानावर आधारित शेती करावी लागणार असून, पाण्याची बचत आणि उच्च दर्जाचे उत्पादन घेण्यासाठी शेतकर्यांनी हरितगृह, शेडनेट शेती विकासावर लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या कृषी, सहकार व यांत्रिकीकरण विभागाचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार काळे यांनी मंगळवारी येथे केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कृषी विस्तार व शिक्षण संचालनालय तसेच केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्यावतीने कृषी विद्यापीठाच्या शेतकरी सदन सभागृहात ह्यवातावरणातील घटकांचे आधुनिक कृषी संरचनेतील महत्त्वह्ण या विषयावर १ ते ८ सप्टेंबरपर्यंत राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी काळे बोलत होते. याप्रसंगी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर.जी. दाणी, विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले, अधिष्ठाता डॉ. विलास भाले, डॉ. सुधीर वडतकर,डॉ. तामगाडगे, डॉ. प्रदीप बोरकर, तसेच प्रशिक्षण समन्वयक डॉ. सूचिता गुप्ता यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी काळे यांनी दरवर्षी अन्नधान्याच्या होत असलेल्या नुकसानीवर चिंता व्यक्त करताना, कृषी संरचनेत वातावरणातील घटकांचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. याकरिता कृषी विद्यापीठांच्या शास्त्रज्ञांसह, कृषीशी निगडित संशोधन संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे अधोरेखित केले. संरक्षित शेती करण्यासाठी शासनाच्या विविध योजना असून, शेडनेट, हरितगृह, जनावरांचा गोठा, मृद संधारण संरचना इत्यादी सर्व पर्जन्य आधारित शेती पद्धतीसाठी या योजनांचा शेतकर्यांना लाभ घेता येणार आहे. डॉ. दाणी यांनी काटेकोर शेती करण्याची गरज असल्याचे सांगितले. अन्नसुरक्षेसाठी संरक्षित शेती काळाची गरज असल्याचे डॉ. सुधीर वडतकर यांनी प्रास्ताविकात सांगितले. या प्रशिक्षण कार्यक्रमात देशातील कोलकाता, मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील कृषी तज्ज्ञ, कृषी अधिकार्यांचा सहभाग आहे.