शेतक-यांच्या मालाला बाजार समितीत ‘नो एण्ट्री’

By Admin | Updated: April 11, 2017 01:42 IST2017-04-11T01:42:54+5:302017-04-11T01:42:54+5:30

बाश्रीटाकळी रस्त्यावर दोनशे ट्रॅक्टर रांगेत उभे.

Farmer's 'No Entry' in Malala Market Committee | शेतक-यांच्या मालाला बाजार समितीत ‘नो एण्ट्री’

शेतक-यांच्या मालाला बाजार समितीत ‘नो एण्ट्री’

बाश्रीटाकळी / सायखेड : एकीकडे शेतमालाला भाव नाहीत, शासन कर्जमाफी देण्यास हुलकावणी देते तर दुसरीकडे शासनाच्या नाफेड केंद्रावर तूर खरेदीसाठी आणली असता, वरिष्ठांचा आदेश नसल्याचे कारण सांगून बाश्रीटाकळी बाजार समिती शेतकर्‍यांच्या मालाला नो एण्टी देत असल्याचे चित्र आहे. १0 एप्रिल रोजी बाजार समितीच्या यार्डमध्ये तुरीने भरलेले २00 ट्रॅक्टर रांगेत उभे असल्याचे चित्र होते.
शासनाने १५ एप्रिलपर्यंत शेतकर्‍यांची तूर खरेदी करण्याचे आदेश दिले आहे; मात्र नाफेडच्या केंद्रावर पाच दिवसांपूर्वीच शेतकर्‍यांनी आणलेली तूर केंद्रामध्ये घेण्यास मनाई केली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या वाहनांची रांग लागली होती.

पालकमंत्र्यांची जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा
शेतकर्‍यांच्या मालाची खरेदी करावी, या मागणीसाठी खरेदी-विक्री संघाने पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांना निवेदन दिले. या निवेदनाची दखल घेत पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी व नाफेडच्या अधिकार्‍यांबरोबर चर्चा केली. यावेळी, सुनील पाटील धाबेकर, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष प्रकाश उपाध्ये, संचालक रमेश बेटकर व इतर संचालकांसह अशोक राठोड, गजानन म्हैसने, दामोदर पाटील आदी उपस्थित होते.

शेतकरी संघर्ष समितीची जिल्हाधिकार्‍यांकडे धाव
दोनशे ते अडीचशे ट्रॅक्टर तुरीने भरलेल्या अवस्थेत बेवारसपणे रस्त्याच्या बाजूला उभे आहेत. ही तूर खरेदी करण्यास बाजार समिती प्रशासनाने नकार दिल्याने १0 एप्रिल रोजी दुपारी बाश्रीटाकळी तालुका शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील धाबेकर व पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांची भेट घेऊन निवेदन दिले. 

बाजार समितीच्या यार्डमधील अंदाजे दोन हजार पोते तूर नाफेडच्या केंद्रावर खरेदी होणे बाकी आहे. वरिष्ठांचे आदेश नसल्याने नव्याने आणलेली तूर खरेदी करणे योग्य नाही.
- प्रवीण महल्ले, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती,बाश्रीटाकळी .

Web Title: Farmer's 'No Entry' in Malala Market Committee