शेतक-यांच्या फसवणुकीचा डाव उधळला!
By Admin | Updated: December 16, 2015 02:07 IST2015-12-16T02:07:26+5:302015-12-16T02:07:26+5:30
इलेक्ट्रॉनिक काट्याचा वापर ; ‘रिमोट’ने कापूस कमी मोजण्याचा प्रयत्न.

शेतक-यांच्या फसवणुकीचा डाव उधळला!
चंद्रशेखर ठाकरे / पिंजर(जि. अकोला): इलेक्ट्रॉनिक काट्याने रिमोटच्या माध्यमातून कापूस कमी मोजून शेतकर्यांची फसवणूक करण्याचा डाव शेतकर्यांच्याच सतर्कतेमुळे मंगळवारी पाराभवानी परिसरात उधळण्यात आला. शेतकर्यांना तफावतीची रक्कम मिळाल्याने या प्रकरणावर पडदा पडला. बाश्रीटाकळी येथील रहिवासी असलेला व्यापारी कापूस खरेदीसाठी पाराभवानी परिसरात आला होता. यंदा जिल्ह्यात जून महिन्याच्या पहिल्या आणि दुसर्या आठवड्यात दमदार पाऊस झाला; मात्र नंतर २५ पेक्षा जास्त दिवस पावसाने दडी मारली. त्यामुळे कपाशीसह इतरही पिकांना फटका बसला. काही ठिकाणी शेतकर्यांना दुबार आणि तिबार पेरणी करावी लागली. पिकांसाठी पाणी उपलब्ध असलेल्या शेतकर्यांनी कशीबशी पिकं जगविली होती. अनेकांचा तर उत्पादनखर्चही निघाला नाही. अशातच आता व्यापारी कापूस खरेदी करताना शेतकर्यांना फसविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा संतापजनक प्रकार उजेडात आला. गत काही दिवसांपासून व्यापारी कापूस खरेदीसाठी गावोगावी फिरत आहेत. बाश्रीटाकळी येथील एक व्यापारीही पाराभावानी परिसरात मंगळवारी आला. त्यामुळे शेतकरीही कापूस घेऊन आले. व्यापारी इलेक्ट्रॉनिक काट्याने कापूस मोजत होता; मात्र कापसाची वेचणी आणि आता विक्रीच्या वेळी केलेल्या कापसाच्या वजनात तफावत असल्याचे शेतकर्यांच्या लक्षात आले. त्यामुळे काही शेतकर्यांनी मोजण्याच्या प्रक्रियेवर नजर ठेवली. व्यापारी रिमोटच्या साहाय्याने माप (वजन) कमी करीत असल्याचे त्यांना आढळून आले. ही वार्ता गावात वार्यासारखी पसरताच ग्रामस्थ गोळा झाले. त्यामुळे व्यापार्याने तेथून पळ काढला. या प्रकाराची माहिती बाश्रीटाकळी येथील काही व्यापार्यांना मिळाल्यानंतर त्यांनी पाराभवानी येथे धाव घेऊन शेतकर्यांशी चर्चा केली. चर्चेअंती शेतकर्यांना तफावतीची रक्कम देण्यात आली.