शौचालय बांधकामाच्या उद्दिष्टपूर्तीची कसरतच!
By Admin | Updated: December 24, 2014 00:07 IST2014-12-24T00:07:35+5:302014-12-24T00:07:35+5:30
नोव्हेंबरअखेर २0 टक्केच उद्दिष्टपूर्ती : अजून ८0 टक्के बाकी.

शौचालय बांधकामाच्या उद्दिष्टपूर्तीची कसरतच!
संतोष वानखडे / वाशिम : हगणदरीमुक्तीचा संकल्प घेऊन निघालेल्या राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने, आठ महिन्यांत शौचालय बांधकामाचे केवळ १९.३३ टक्केच उद्दिष्ट गाठले आहे. शेवटच्या चार महिन्यांत ८0 टक्के उद्दिष्ट गाठण्याची कसरत प्रत्येक जिल्हा परिषदेला करावी लागणार आहे. पाच लाख ९६ हजार ४0६ वैयक्तिक शौचालयापैकी राज्यभरात केवळ एक लाख १५ हजार ३0९ शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले आहे.
स्वच्छ व सुंदर गावाची संकल्पना साकार करण्यासाठी स्वच्छता अभियान, निर्मल भारत अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत शौचालय बांधकाम करण्याला प्रथम प्राधान्य देण्याची अट आहे. २0१४-१५ या वर्षात राज्यभरात पाच लाख ९६ हजार ४0६ वैयक्तिक शौचालय पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यापैकी पाच लाख तीन हजार ७0१ कुटुंब लाभार्थी घटकांमध्ये येतात. या कुटुंबाला शौचालय बांधकाम केल्यानंतर शासनाकडून अनुदानाचा लाभ मिळणार आहे. राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने नोव्हेंबरअखेर राज्यभरातील शौचालय बांधकाम आणि अनुदान वितरित केल्याचा आढावा घेतला असता, धक्कादायक बाबी समोर आल्या. नोव्हेंबरअखेर केवळ एक लाख १५ हजार ३0९ शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाल्याचे सत्य बाहेर आले. आठ महिन्यात केवळ १९.३३ टक्केच उद्दिष्टपुर्ती झाली आहे. आता शेवटच्या चार महिन्यात ८0 टक्के उद्दिष्ट गाठण्याचे अवघड शिवधनुष्य जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता कक्षाला पेलावे लागणार आहे. राज्यात केवळ ठाणे जिल्ह्याने ९0.५८ टक्के उद्दिष्ट गाठले आहे. अर्थात या जिल्ह्यात केवळ ७५२३ शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. उर्वरीत सर्व जिल्हे शौचालय बांधकाम पूर्ण करण्याच्या ११ ते ५0 टक्केवारीत आहेत.
.*नऊ जिल्हे १0 टक्क्यांच्या आत!
राज्यातील रत्नागिरी, बीड, सांगली, गडचिरोली, रायगड, नागपूर, वर्धा, सिंधुदुर्ग, जालना या नऊ जिल्ह्यांमध्ये शौचालय बांधकाम १0 टक्क्यांच्या आतमध्येच आहे. चार महिन्यांत उद्दिष्टपूर्ती कशी होईल? हा महत्त्वाचा प्रश्न आहे.