सकल संतांच्या ग्रंथांचा सार म्हणजे ग्रामगीता!
By Admin | Updated: December 25, 2016 02:41 IST2016-12-25T02:41:03+5:302016-12-25T02:41:03+5:30
ग्रामगीताचार्य मनोहरदादा रेचे यांचे प्रतिपादन

सकल संतांच्या ग्रंथांचा सार म्हणजे ग्रामगीता!
अकोला, दि. २४- संतांनी मांडलेले विचार हे जीवनात परिवर्तन घडविणारे असतात. सर्व संतांनी मांडलेले विचार गं्रथ स्वरूपात उपलब्ध आहेत. ते आचरणात आणले पाहिजे. सकल संतांनी निर्माण केलेल्या गं्रथांचा सार म्हणजे ग्रामगीता असून, यामध्ये समाजातील सर्व समस्यांचे समाधान आहे, असे प्रतिपादन अंजनगाव सूर्जी येथील ग्रामगीताचार्य मनोहरदादा रेचे यांनी शनिवारी येथे केले.
अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळांतर्गत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समिती अकोलातर्फे स्वराज्य भवन प्रांगणात आयोजित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाच्या दुसर्या दिवशी शनिवारी ग्रामगीतेवर व्याख्यान देताना ते बोलत होते. राष्ट्रसंतांना वंदन करून त्यांनी ग्रामगीतेवरील व्याख्यानाला सुरुवात केली. मनोहरदादा रेचे यांनी आपल्या व्याख्यानादरम्यान विविध दाखले देऊन ग्रामगीतेची आजच्या काळातील उपयुक्तता पटवून सांगितली. वंदनीय तुकडोजी महाराजांनी सहज समजेल, अशा भाषेत तत्त्वज्ञान सांगितले. तत्त्वज्ञानाला अध्यात्माची जोड असेल, तरच ते समाजाच्या पचनी पडते. राष्ट्रसंतांनी सांगितलेल्या तत्त्वज्ञानाला अध्यात्माची जोड आहे, म्हणूनच ग्रामगीता जनसामान्यांना आपली वाटते. ग्रामगीतेला अध्यात्माची जोड आहे. ग्रामगीतेमध्ये जगाच्या कल्याणाचा विचार मांडलेला आहे. ग्रामगीतेमध्ये ज्याला जे जे हवे, ते ते उपलब्ध आहे. जनसामान्यांच्या, शेतकर्यांच्या सर्व समस्यांची उकल ग्रामगीतेत तुकडोजी महाराजांनी केली आहे. संत सहज बोलले तरी तो हितोपदेश ठरतो. संत कधीही बाष्कळ चर्चा करीत नाहीत. राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेत समाजातील सर्वच घटकांचा विचार केला आहे. भागवत गीतेचे सक्रिय स्वरूप म्हणजे ग्रामगीता आहे, असे विचार मनोहरदादा रेचे यांनी मांडले.
ग्रामगीता ताठ मानेने जगायला शिकविते!
ज्याला स्वत:चा परिचय झाला, स्वत:चा आत्मा कळला, तोच इतरांचे कल्याण करू शकतो. ज्याला स्वत:चाच परिचय झाला नाही, तो इतरांसाठी काहीही करू शकत नाही. ग्रामगीतेत तुकडोजी महाराजांनी स्वत:ला ओळखण्याचा सल्ला दिला आहे. ग्रामगीता हताश, निराश झालेल्या समाजाला नवसंजीवनी देणारी आहे. हतबल झालेल्या व्यक्तीला ग्रामगीता ताठ मानेने जगणे शिकविते, असे विवेचन रेचे यांनी केले.