अतिक्रमणाचा सफाया
By Admin | Updated: June 20, 2014 00:44 IST2014-06-20T00:44:05+5:302014-06-20T00:44:49+5:30
परिसरातील अतिक्रमणाचा सफाया करण्यात आला.

अतिक्रमणाचा सफाया
अकोला : स्थानिक जठारपेठ चौकातील अतिक्रमित भाजी विक्रेत्यांसह परिसरातील अतिक्रमणाचा सफाया करण्यात आला. कारवाईला अडथळा आणण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी गुरुवारी स्वत: आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांना रस्त्यावर उतरावे लागले. रस्त्यावर पुन्हा अतिक्रमण थाटल्यास फौजदारीचा इशारा आयुक्तांनी दिला. अत्यंत वर्दळीचा मार्ग असलेल्या जठारपेठ चौकात भाजी विक्रेत्यांनी चक्क रस्त्यावरच ठिय्या मांडला आहे. माजी आरोग्यमंत्री डॉ.प्रमिलाताई टोपले यांच्या खासगी हॉस्पिटलसह छत्रपती शिवाजी माध्यमिक शाळा व रहिवासी इमारतींना अक्षरश: भाजी विक्रेता, फळ विक्रेत्यांनी विळखा घातल्याचे चित्र आहे. परिणामी या मार्गावरून पायी चालणेदेखील अवघड झाले. परिसरात खासगी शाळा, मनपा शाळांसह मंगल कार्यालये असून, या मार्गावरूनच एसटी बसेसचीसुद्धा वर्दळ असते. अतिक्रमकांनी नागरिकांच्या घरालाच विळखा घातल्याने वादावादाचे प्रसंग उद्भवतात. या परिसरातील अतिक्रमण हटविण्या संदर्भात मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने मनपाला निर्देश दिले होते; परंतु मनपातील काही खादाड प्रवृत्तीच्या अधिकार्यांमुळे एकही भाजी विक्रेता जागेवरून उठला नाही, हे उल्लेखनीय. अखेर नागरिकांच्या समस्येची दखल घेत, आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी जठारपेठ चौक ते दुर्गा चौकपर्यंतच्या मार्गावरील संपूर्ण अतिक्रमणाचा फडशा पाडला. यावेळी आयुक्तांसह उपायुक्त दयानंद चिंचोलीकर, अतिक्रमण विभाग प्रमुख विष्णू डोंगरे यांसह कर्मचारी उपस्थित होते.