निष्काम भक्तीचा विचार अंगीकारा

By Admin | Updated: August 29, 2014 23:50 IST2014-08-29T23:42:04+5:302014-08-29T23:50:45+5:30

बुलडाणा येथे श्रीचक्रधर स्वामी अवतार दिन उत्साहात; आचार्य लोणारकरबाबा महानुभाव यांचे मत

Embodiment of devotion to devotion | निष्काम भक्तीचा विचार अंगीकारा

निष्काम भक्तीचा विचार अंगीकारा

बुलडाणा : निष्काम भक्तीतूनच परमेश्‍वराची प्राप्ती होऊ शकते आणि माणूस आपले कल्याण करून घेऊ शकतो. पाच हजार वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्णांनी निष्काम भक्तीचा विचार गीतेतून मांडला. हाच विचार पुढे सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामींनी मांडला. या निष्काम भक्तीचा विचार जीवनात अंगीकारा, असे मत अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषदेचे अध्यक्ष आचार्य लोणारकरबाबा महानुभाव यांनी व्यक्त केले.
बुलडाणा येथील गोपाल आश्रम येथे गुरुवारी सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामी अवतार दिन महोत्सव व राज्यस्तरीय श्रीमद् भगवदगीता ज्ञानस्पर्धेचे बक्षीस वितरण झाले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना लोणारकरबाबा बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी आचार्यप्रवर लासुरकरबाबा होते. प्रमुख वक्ते म्हणून कराड येथील महानुभाव साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. कन्हैया कुंदप उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून आचार्यप्रवर मेहकरकरबाबा, महंत पाथ्रीकरबाबा, आमदार विजयराज शिंदे, जि.प. अध्यक्ष वर्षा वनारे, सभापती लक्ष्मी शेळके, राष्ट्रवादीचे नरेश शेळके यांच्यासह आचार्य व संत-महंत उपस्थित होते. लोणारकरबाबा यांनी माणूस आपल्या आयुष्यातील अधिकाधिक वेळ प्रापंचिक सुख मिळविण्यासाठी घालवितो. धर्मकार्यासाठी तो वेळ काढत नाही. दु:ख आले तरच त्याला देवाची आठवण होते. हे चुकीचे आहे. सुख असो वा दु:ख प्रत्येक क्षणी देवाची आठवण करीत राहिलं पाहिजे, असे त्यांनी सांगितले. कराड येथील डॉ. कन्हैया कुंदप यांनी गीतेचे संस्कृतमधील तत्त्वज्ञान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींनी साध्या सोप्या मराठी भाषेत मांडले. सर्वसामान्य माणसाची कणव असणार्‍या स्वामींनी अतिशय ओघवत्या भाषेत गीतेचे तत्त्वज्ञान मांडले. त्याचा अंगीकार करून माणूस आत्मकल्याण करून घेऊ शकतो, असे सांगितले. मराठी भाषेचा कैवार घेऊन स्वामींनी जाणीवपूर्वक आपले विचार मराठीत मानले. स्त्रीयांना स्वातंत्र्याचा अधिकार देणारे स्वामी पहिलेच आहेत. स्वामींच्या सामाजिक कार्याची प्रेरणा घेऊनच पुढे अनेक महापुरुषांनी कार्य केले. त्याकडे आपण डोळस पद्धतीने पाहणे आवश्यक असल्याचे कुंदप यांनी सांगितले. इतर मान्यवरांनीदेखील यावेळी मार्गदर्शन केले. राज्यस्तरीय श्रीमद् भगवद्गीता ज्ञान स्पर्धेत उत्कृष्ट गुण मिळविणार्‍या विद्यार्थ्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. प्रास्ताविक महंत पाथ्रीकरबाबा यांनी केले. संचालन सैंगराजदादा बिडकर यांनी तर आभार उद्धव वाळेकर यांनी मानले. यावेळी राज्यभरातून आलेले महानुभावपंथीय उपस्थित होते.

Web Title: Embodiment of devotion to devotion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.