अकरावीमध्ये प्रवेशाचा गुंता कायम!
By Admin | Updated: September 4, 2015 22:51 IST2015-09-04T22:51:14+5:302015-09-04T22:51:14+5:30
पुरवणी परीक्षा लवकर घेऊनही विद्यार्थ्यांची भटकंती.

अकरावीमध्ये प्रवेशाचा गुंता कायम!
खामगाव (बुलडाणा): जुलै २0१५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या पुरवणी परिक्षेचा निकाल २६ ऑगस्ट रोजी जाहीर झाला असून, उत्तीर्ण विद्यार्थ्यांना गुणपत्रिकाही मिळाल्या आहेत. आता अकरावीमध्ये प्रवेश घेण्यासाठी हे विद्यार्थी शाळेत गेले असता, त्यांना प्रवेश मिळत नसल्याने अकरावीच्या प्रवेशाचा गुंता वाढला आहे. इयत्ता दहावीच्या मार्च २0१५ च्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जावू नये, याकरीता शासनाने ऑक्टोबरऐवजी जुलै महिन्यात पुरवणी परिक्षा घेण्याचे धोरण अवलंबिले. त्यानुसार जुलै महिन्यात दहावीच्या पुरवणी परीक्षा होवून त्याचा निकालही जाहीर झाला. या पुरवणी परीक्षेत दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी प्रवेशासाठी शाळांमध्ये गेले असता त्यांना प्रवेश नाकारण्यात येत आहे. अगोदरच अकरावीमध्ये विद्यार्थ्यांची पुरेसी संख्या असल्याचे कारण पुढे करून, पुरवणी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला जात आहे. शिक्षण विभागाकडून संमतीपत्र आल्यानंतरच प्रवेश देणार असल्याचे काही शाळांनी स्पष्ट केले असून, त्यामुळे तालुका स्तरावर विद्यार्थी गटशिक्षणाधिकार्यांच्या भेटी घेत आहेत. महत्वाचे म्हणजे, गटशिक्षणाधिकारी स्तरावरही याबाबत कोणताच आदेश नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. शासनाने पुरवणी परिक्षा लवकर घेवून विद्यार्थ्यांना दिलासा दिला; मात्र अकरावीत प्रवेशच मिळत नसल्याने पुरवणी परीक्षा लवकर घेऊन कोणताही उपयोग झाला नसल्याचे चित्र दिसत आहे.