लेमन सिटीवर आर्थिक संकट !

By Admin | Updated: November 18, 2016 03:00 IST2016-11-18T03:00:16+5:302016-11-18T03:00:16+5:30

निर्यातक्षम लिंबाची बाजारपेठ कोसळली !

Economic crisis on Lemon City! | लेमन सिटीवर आर्थिक संकट !

लेमन सिटीवर आर्थिक संकट !

राजरत्न सिरसाट
अकोला, दि. १७- पाचशे आणि एक हजाराच्या नोटा चलनातून बाद झाल्याने शेती अर्थकारणावर याचा अधिक प्रभाव पडला आहे. भाजीपाला, फळांसारख्या नाशवंत वस्तूची खरेदी-विक्री कमी झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. अकोला जिल्हा लिंबू उत्पादक जिल्हा म्हणून विदर्भात प्रख्यात आहे. म्हणूनच अकोला शहराला लेमन सिटी हे नाव पडले आहे; पण या लेमन सिटीवर आजमितीस आर्थिक संकट घोंगावत आहे.
जिल्हय़ात लिंबू फळपिकाचे क्षेत्र हे ७५ हजार हेक्टरच्यावर होते; पण आजमितीस हे क्षेत्र २,४00 हेक्टरवर आले आहे. निर्यातक्षम दर्जाचे लिंबू उत्पादन येथे घेतले जाते. देशातील प्रत्येक प्रांतात वाडेगावचा लिंबू प्रसिद्ध आहे. दिल्ली,पंजाब, काश्मीरच्या बाजारपेठेत या लिंबची मोठी मागणी आहे, तसेच लिंबूवर प्रक्रिया करणारा राज्यातील पहिला कारखाना जिल्हय़ातील बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे सुरू करण्यात आला होता; पण सुविधा आणि अनुदानाअभावी हा कारखाना बंद पडला. लासलगाव येथे आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ आहे.तशीच वाडेगाव येथे विदर्भातील मोठी लिंबूची बाजारपेठ आहे; पण पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर नोटासारखीच अवकळा या लिंबूला आली आहे. व्यापार्‍याकडे पैसा नसल्याने मागील आठ दिवसांपासून येथील लिंबू खरेदी ठप्प पडली आहे. दररोज तीन ते चार हजार गोण्या उत्पादन आहे; परंतु कोणी घेणाराच नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. तीच परिस्थिती अकोला शहरातील बाजारात आहे. बाजारात सध्या तीनशे ते साडेतीनशे गोण्या लिंबूची आवक आहे. बाजारात एक किलो लिंबूची किंमत २0 ते २२ रुपये होती आता १४ ते १५ रुपयानेप्रमाणे लिंबू विकला जात आहे.
एकूणच वाडेगाव आणि अकोला बाजारपेठ मिळून पाच ते दहा लाख रुपयाचे लिंबू खरेदी-विक्रीचे व्यवहार १0 ते २0 टक्कय़ावर आले आहेत. शेतकर्‍यांकडे पैसेच नसल्याने वाहतूक करणे कठीण झाल्याने शेतकर्‍यांकडील लिंबू सडण्याचे प्रकार घडत आहेत. पाण्याची अनिश्‍चितता, लिंबू उत्पादकाकडे होत असलेले शासनाचे दुर्लक्ष यामुळे अगोदरच लिंबूचे क्षेत्र घटले आहे. वाडेगाव जिल्हय़ातील काही शेतकर्‍यांनी प्रतिकूल परिस्थितीत काही क्षेत्र टिकवून ठेवले आहे; परंतु अचानक पैशाची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने लिंबूची बाजारपेठ कोसळली असून, भाजीपाला, धान्य इतर सर्वच प्रकारचे व्यवहार ठप्प पडल्याने लेमन सिटीवर आर्थिक संकट निर्माण झाले आहे.

पैशाचा तुटवडा आणि ग्राहक व शेतकरी, व्यापार्‍यांकडे पैसेच नसल्याने लिंबू खरेदी-विक्रीवर मोठे परिणाम झाले आहेत. बाजारात पाचशे, सातशे लिंबूच्या गोण्या येत होत्या. हे प्रमाण अध्र्यापेक्षा कमी झाले आहे. कोणी घेणाराच नसल्याने लिंबूचे दर कोसळले आहेत.
- किशोर ढोमणे,
लिंबू व्यापारी, जनता ठोक भाजीबाजार, अकोला.

Web Title: Economic crisis on Lemon City!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.