बदलत्या जीवनशैलीमुळे चिमुकल्यांनाही मधुमेहाचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 13:28 IST2018-11-14T13:27:58+5:302018-11-14T13:28:23+5:30
अकोला: बदलत्या जीवनशैलीमुळे आज मधुमेह आजाराने विक्राळ स्वरूप धारण केले आहे. प्रौढच नव्हे, तर लहान मुलांवरही मधुमेहाचे सावट आहे.

बदलत्या जीवनशैलीमुळे चिमुकल्यांनाही मधुमेहाचा धोका
अकोला: बदलत्या जीवनशैलीमुळे आज मधुमेह आजाराने विक्राळ स्वरूप धारण केले आहे. प्रौढच नव्हे, तर लहान मुलांवरही मधुमेहाचे सावट आहे. चोरपावलांनी येणारा मधुमेह अन्य मोठ्या आजारांना आपोआपच निमंत्रण देतो. मधुमेह आणि त्यापासून उद्भवणाऱ्या व्याधींमुळे निर्माण झालेली समस्या आपल्या आजच्या पिढीसमोर एक मोठे आव्हानच ठरत आहे. त्यामुळे मधुमेहाचे धोके वेळीच ओळखणे गरजेचे आहे.
देशात मधुमेह झपाट्याने पसरत आहे. अवघ्या १० व्या-१२ व्यावर्षी मुलांमध्ये दिसणारा मधुमेह तज्ज्ञ डॉक्टरांना आव्हान देत आहे. २०२१ पर्यंत भारत मधुमेहाची राजधानी ठरणार, असा इशारा डब्ल्यूएचओ तसेच जागतिक मधुमेह संघाने दिला आहे. लहान मुलांमध्ये मधुमेहाचे वाढते प्रमाण आणि त्याचे काय परिणाम होत आहेत, चला तर जाणून घेऊया.
लहान मुलांमधील वाढता मधुमेह
मधुमेह फक्त प्रौढांपुरताच मर्यादित नसून, लहान मुलांनाही (०-१५ वर्षे) तो होऊ शकतो. ही बाब अद्यापही अनेकांना माहीत नाही. एकूण मधुमेहींपैकी सर्वसाधारणत: ९५ टक्के प्रौढ लोकांमध्ये आणि फक्त ५-६ टक्के लहान मुलांमध्ये असे प्रमाण काही वर्षांपूर्वी होते. तेच प्रमाण सध्या आठ टक्क्यांवरून १२-१३ टक्के इतके वाढले आहे. इन्शुलिन तयार करणाºया स्वादूपिंडातील बिटा पेशी जर पूर्णत: नष्ट झाल्या, तर हा आजार उद्भवतो. सर्वसाधारणत: जंतूंच्या प्रादुर्भावामुळे बिटा पेशींना नष्ट करणाºया अँटी बॉडिज आपल्या शरीरात तयार होतात आणि बिटा पेशी नष्ट होऊन मधुमेहाला सुरुवात होते. त्यामुळे रुग्णाचे वजन झपाट्याने कमी होते. लघवी, तहान फार लागते, मुले अगदी अशक्त होतात आणि वेळीच लक्षात न आल्यास रक्तातील शर्करा फार वाढते. आयुष्यभर दिवसातून २-३ आणि गरज असल्यास चार वेळाही इन्शुलिनचे इंजेक्शन घेण्यावाचून त्यांना काहीही पर्याय नसतो.
परिणाम
या आजारामुळे मुलांच्या दैनंदिन जीवनावर, मानसिकतेवर, शालेय जीवनावर पडतो. या आजारात त्या मुलांच्या खाण्याच्या वेळा, इन्शुलिनच्या वेळा, नियमित रक्त तपासणी, इतर तपासण्या यावर फार बारीक आणि नियमित लक्ष ठेवणे गरजेचे असते. छोट्याशा चुकीमुळे साखर एकदम कमी होऊन ही मुले एकदम आजारी होऊ शकतात आणि वेळेवर लक्षात न आल्यास बेशुद्धही होऊ शकतात.