वळवाच्या पावसाने शेतकरी सुखावला!

By Admin | Updated: June 7, 2016 07:42 IST2016-06-07T07:42:01+5:302016-06-07T07:42:01+5:30

मशागत, बियाणे खरेदीला तुरळक सुरुवात.

Drought has dried the farmer! | वळवाच्या पावसाने शेतकरी सुखावला!

वळवाच्या पावसाने शेतकरी सुखावला!

अकोला: वळवाच्या (मान्सूनपूर्व) पावसाने विदर्भातील शेतकरी सुखावला असून, काही शेतकर्‍यांनी मशागतीला सुरुवात केली, तर काहींनी अल्प प्रमाणात बियाणे खरेदीला सुरुवात केली आहे.
मागील आठ दिवसांपासून विदर्भात मान्सूनपूर्व पाऊस अधूनमधून कोसळत आहे; परंतु या पावसाला सार्वत्रिक स्वरू प नसल्याने ज्या भागात तो बरसला, त्या भागातील शेतकर्‍यांनी मशागतीला सुरुवात केली; परंतु बहुतांश शेतकर्‍यांच्या हाती पैसाच नसल्याने ते पीक विमा नुकसानभरपाईची प्रतीक्षा करीत आहेत.
संपूर्ण विदर्भात खरीप हंगामाचे ५0 लाख हेक्टर क्षेत्र असून, पश्‍चिम विदर्भातील (वर्‍हाड) यात ३२ लाख हेक्टरचा समावेश आहे. पूर्व विदर्भात धान हे महत्त्वाचे पीक आहे, तर पश्‍चिम विदर्भात कापूस आणि सोयाबीन या पिकाची जवळपास २३ ते २४ लाख हेक्टरवर पेरणी केली जाते. मागील चार ते पाच वर्षांंपासून पावसाची अनिश्‍चितता असल्याने उत्पादन व उत्पन्न घटल्याने शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यांच्या हातात पैसाच नसल्याने मशागतीला यावर्षी वेळ होत आहे. गतवर्षी पडलेल्या दुष्काळाने शेतकर्‍यांच्या आर्थिक अडचणीत पुन्हा भर घातली आहे. परिणामी हातात पैसा नसल्याने बियाणे खरेदीचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी, १५ मेपासून सुरू होणार्‍या बियाणे खरेदीला अद्याप हवी तशी सुरुवात झाली नाही.
दरम्यान, गत आठ दिवसांपासून विदर्भात काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरी सुखावला असून, दुष्काळाने कडक झालेली शेतजमीन मऊ झाल्याने सधन शेतकर्‍यांनी काही ठिकाणी मशागतीला सुरुवात केली आहे.

Web Title: Drought has dried the farmer!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.